तोट्यातील `लालपरी`ला माल वाहतूकीचा आधार 

st news.jpg
st news.jpg

लातूर : अगोदरच तोटा आणि त्यात कोरोनाचा मोठा फटका बसला. त्यामुळे तोट्याच्या चिखलात अडकलेली लालपरीला बाहेर काढण्यासाठी उत्पन्नाचे नवा मार्ग महामंडळाने शोधला. आयुर्मान संपलेल्या बसेसला बंदिस्त ट्रकमध्ये रुपांतर करून माल वाहतूक सुरु केली आहे. गेल्या दोन महिन्यात लातूर विभागाला यातून आठ लाखाचे उत्पन्न झाले आहे. माल वाहतूकीला प्रतिसाद चांगला मिळत असल्याने आणखी पाच ट्रक वाढवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

लातूर विभागात दहा ट्रक

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी मार्चपासून राज्यात सातत्याने लॉकडाऊन सुरु आहे. याचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. गेल्या महिन्यात काही दिवस अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर बसेस सुरु झाल्या. पण त्याला प्रवाशांच्या क्षमतेवर मर्यादा आल्या. केवळ २२ प्रवाशी घेवूनच बसेस धावल्या. त्यात कोरोनाची भिती असल्याने अनेक ठिकाणी प्रवाशांनी बसकडे पाठही फिरवली. एकूणच आर्थिक परिस्थिती बिकट होत चालल्यानंतर जूनमध्ये महामंडळाने माल वाहतूक करण्याचा निर्णय घेतला होता. आयुर्मान संपलेल्या बसेसचे ट्रकमध्ये रुपांतर करून त्या बसेस माल वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आल्या. लातूर विभागात अशा दहा बसेस ट्रक म्हणून वापरण्यात आल्या आहेत.

ट्रकनी केल्या २२५ फेऱया

महामंडळाच्या या उपक्रमाला जिल्ह्यातील व्यापाऱयांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. येथून राज्यातील विविध भागात शेतमाल, पाणी बॉटल, खत, सोयाबीन, तेल असा विविध माल पाठवण्यात आला आहे. जून आणि जुलै या दोन महिन्यात २२५ फेऱया या ट्रकनी राज्यभरात करत मालाची वाहतूक केली आहे.

दोनशे ट्रक माल भरून दिला

लातूर विभागाच्या ट्रकला प्रतिसाद तर मिळालाच पण इतर विभागातून दोनशे ट्रक माल लातूर जिल्ह्यात आला होता. या सर्व ट्रकमध्ये माल भरून देण्याचे कामही लातूरच्या विभागाने केले आहे. यातूनही महामंडळाच्या इतर विभागालाही उत्पन्न मिळाले आहे.

आठ लाखाचे मिळाले उत्पन्न

माल वाहतूक करण्याचा महामंडळाचा पहिलाच प्रयोग आहे. ही वाहतूक तोट्यात जाणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. या करीता महामंडळाने ठराविक दर ठरवून दिला असला तरी स्थानिक बाजारातील दर पाहून हे दर ठरवण्याचा अधिकार संबंधीत अधिकाऱयांना देण्यात आला होता. स्पर्धेत टिकण्यासाठी हे दर मात्र कमीच होते. यातून दोन महिन्यात आठ लाखाचे उत्पन्न विभागाला मिळाले आहे.


लातूर जिल्ह्यात माल वाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या दहा ट्रक माल वाहतूक करीत आहेत. लवकरच आणखी पाच ट्रक तयार होत आहेत. राज्यातील विविध भागात माल पोहचवण्याचे काम केले जात आहे. लॉकडाऊऩच्या दोन महिन्यात आठ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.
सुनील क्षीरसागर, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, लातूर
 

संपादक-प्रताप अवचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com