औरंगाबाद : गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेल्या बाजारपेठा शुक्रवारपासून (ता.५) सम-विषम पद्धतीने सुरु झाल्या. सम-विषमच्या नियमानुसार टिळकपथ, गुलमंडी, कासारी बाजार, कॅनाट प्लेस, टि.व्ही सेंटर बाजारपेठ खुली झाली. पहिला दिवस असल्याने अपेक्षेप्रमाणे काही ठिकाणी गर्दी झाली. बऱ्याच दिवसांनंतर दुकाने सुरु झाल्याचे समाधान व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले. अनेकांना श्रीफळ फोडून दुकानांची कुलपे उघडली.
सराफा मार्केट, कपडा मार्केट, सराफा बाजारातील बहूतांश दुकानांत सॅनिटायझर व्यवस्था होती. शिवाय थर्मामीटर, ऑक्सीमीटरच्या माध्यमातून ग्राहकांची तपासणी करण्यात आली. नेहमी ग्राहकांच्या गर्दीने फुलणारी गुलमंडी, टिळकपथसह शहर परिसरातील सर्व मार्केट आज फुलले होते. शहरातील पथारी व्यवसायिकांनीही आपले दुकाने सुरु झाली.
हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ
मोबाईल खरेदीसाठी गर्दी
शहरातील मिनी मार्केट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅनॉटमध्ये मोबाईल खरेदीसाठी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली. फायनान्स बंद असल्यामुळे अनेकांना रोखीने मोबाईल खरेदी करावे लागले. त्यामुळे शहरातील मोबाईल मार्केटमध्ये पहिल्या दिवशी लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. कॅनॉट मध्ये सकाळी नऊ वाजेपासून दुकाने उघडली. प्रत्येक दुकानासमोर फिजिकल डिस्टन्स राहावे यासाठी मार्किंग करण्यात आले. जालना रोडवरील उत्तर दिशेने असलेली सर्वच आस्थापने सुरू होती तर दक्षिणेकडील बंद होती. पथारी व्यवसायिकांकडेही गर्दी दिसून आली. टीव्ही सेंटर येथील मार्केट हे आज सकाळपासून सुरू झाले.
हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात..
७५ दिवसानंतर सुरू झालेल्या दुकानामुळे व्यापाऱ्यांमध्ये नवं चैतन्य निर्माण झाले आहे. सर्वांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार सम-विषम पद्धतीचा अवलंब केला आहे. एवढेच नव्हे, तर सॅनिटायझर, थर्मलगन, ऑक्सिजन मीटरचा उपयोग करीत बहुतांश व्यापाऱ्यांनी स्वतःच्या व ग्राहकांच्या सुरक्षेचीही काळजी घेतली.
-जगन्नाथ काळे, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ
थर्मलगन, ऑक्सिमिटर मशीनची सक्ती केली तरी त्याची उपलब्धता शहरात नाही. इतर शहरात हे सक्ती केलेली नाही, मात्र येथेच का सक्ती करण्यात येत आहे? याचा पुनर्विचार जिल्हा प्रशासनाने करावा. बाजारपेठा सुरू झाल्यामुळे शहरात एकूणच सर्वच अर्थचक्र सुरू झाले आहे.
-लक्ष्मीनारायण राठी, सचिव, जिल्हा व्यापारी महासंघ
लग्नसराई रमजान ईदसह सर्व महत्त्वाचे सिझन गेले. वर्षभरातील जवळपास ५५ टक्के वार्षिक नुकसान झाले. आज दुकाने सुरू झाली आहेत याचा आनंद आहे. आमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांचे स्क्रीनिंग, त्यानंतर ऑक्सीजन मीटरच्या माध्यमातून तपासणी केल्यानंतरच त्यांना दुकानात प्रवेश देतो. ग्राहकही त्यांच्यापरीने काळजी घेत आहेत.
-सुनील अग्रवाल, कापड व्यावसायिक
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.