मंत्रालयातील जातीयवादी लोकांकडून वंचितांवर अन्याय - खोब्रागडे 

मंत्रालयातील जातीयवादी लोकांकडून वंचितांवर अन्याय - खोब्रागडे 

औरंगाबाद- वंचितांना संविधानाने दिलेल्या हक्‍कांपासून वंचित ठेवण्याचे काम मंत्रालयातील काही जातीयवादी लोक करीत असल्याचा आरोप निवृत्त सनदी अधिकारी तथा महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे अध्यक्ष ई. झेड. खोब्रागडे यांनी केला. तसेच समाजाचे प्रश्‍न व त्यावरील उपाय मुख्यमंत्री, सचिवांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील वर्ग-1 व 2 पदी असलेल्या अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमची शनिवारी (ता. 27) शहरात चिंतन बैठक झाली. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. खोब्रागडे म्हणाले, की समाजाचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. केंद्र व राज्य सरकार त्यांच्या साडेचार वर्षांतील कारकिर्दीचे सेलिब्रेशन जोरात करीत आहे. सरकार कुणाचेही असो, त्यांचे काम समाजातील कमकुवत घटकांच्या कल्याणासाठी असावे लागते, तसे होत असल्याचे जाणवत नाही. त्यामुळे सरकार अन्याय, अत्याचाराचे सेलिब्रेशन कसे काय करू शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निधी नसेल तर शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास कसा होईल. जोपर्यंत अनुशेष भरून काढत नाहीत, तोपर्यंत नव्याने निश्‍चित केलेली 72 हजार जागांची भरती करू नये, मागासवर्गीयांच्या पदोन्नतीसंदर्भातील आरक्षणाबाबत एकजुटीने लढा उभारणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकारी भारत कदम, माहिती अधिकारी वंदना थोरात, यशदाचे बनन जोगदंड आदी उपस्थित होते. 

खासगी क्षेत्रात हवे आरक्षण
तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. असे असताना सेवानिवृत्त झालेल्या लोकांना पुन्हा सेवेत घेत आहेत. शिक्षण घेतलेल्या मुलांनी काय करायचे? त्यामुळे खासगी क्षेत्रातही आरक्षण द्यायला हवे, अशी मागणी श्री. खोब्रागडे यांनी यावेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com