परभणी पोलिसांमुळे बेपत्ता मुली परत कुटूंबाच्या छायेखाली

New Police
New Police

परभणी : शिकवणीसाठी घरातून गेलेल्या मुलींचे अपहरण झाले. परंतु, नानलपेठ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून केवळ पाच तासाच या दोन्ही मुलींना मनमाड येथे ताब्यात घेतले. ही घटना गुरुवारी (ता.२८) परभणी शहरातील आनंद नगरमध्ये घडली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन्ही चिमुकल्या परत कुटूंबाच्या छत्रछायेखाली परत आल्याने पोलिसांची कारवाई कौतूकास पात्र ठरली आहे. दरम्यान, या मुलींचे अपहरण झाले की अजून काही याचा शोध पोलिस घेत आहेत.

परभणी शहरातील आनंद नगर भागातील रहिवाशी शेख अलीम शेख चांद (वय ५०) यांनी गुरुवारी (ता.२८) रात्री ११ वाजता पोलिस ठाण्यात दोन अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याची तक्रार दिली. या वेळी पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक एस.एस.सानप, ठाणे अंमलदार आर.आर. हक्क, शिपाई श्री. बेटकार व श्री. सोनवणे कर्तव्यावर हजर होते. दोन्ही मुली धार्मीक शिक्षण घेण्यासाठी गुरुवारी (ता.२८) गेल्या होत्या. परंतु, त्या रात्री उशिरापर्यंत घरी परत आल्याच नाहीत. त्यामुळे त्यांच्या पालकांनी त्यांची शोधा- शोध सुरू केली. शेवटी मुली मिळत नसल्याने शेख अलीम शेख चांद यांनी पोलिसांकडे धाव घेतली. घटना गंभीर असल्याने सहायक पोलिस निरीक्षक एस.एस.सानप यांनी याची माहिती तातडीने पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, सहायक पोलिस अधिक्षक नितीन बगाटे व पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना दिली.

सहायक पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी तातडीने पोलिस ठाण्यात येऊन घटनेवर लक्ष केंद्रीत करून मुलींच्या शोधासाठी पथक तयार केले. मुलींचे फोटो सर्व पोलिस ठाणे व इतर पाठविण्यात आले. त्या दरम्यान या मुलींनी तिच्या वडीलांच्या मोबाईलवर संपर्क केला. परंतू त्या कुठे आहेत हे कळण्याआगोदरच मोबाईलवरील संपर्क तुटला व नंतर मोबाईल बंद झाला. परंतू समोरून रेल्वेचा आवाज येत असल्याची माहिती पालकांनी पोलिसांना दिली. त्यामुळे मुली रेल्वे गाडीत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे नांदेड ते मनमाड या लोहमार्गावरील रेल्वे पोलिसांना अलर्टच्या सुचना देण्यात आल्या. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवांनानी देवगिरी रेल्वे पूर्णपणे तपासली. परंतू सदर वर्णनाच्या मुली सापडल्या नाहीत.

त्यामुळे पोलिसांसमोर पुन्हा प्रश्न उभा राहिला. परंतू अखेर रात्री दोन वाजता या दोन्ही मुली मनमाड रेल्वेस्थानकात मनमाड येथील रेल्वे सुरक्षा बलाचे सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय गांगुर्डे, बी.बी.चव्हाण व महिला पोलिस हवालदार कल्पना पाठक यांना निदर्शनास आल्या. मनमाड पोलिसांनी या मुलींना ताब्यात घेऊन परभणी पोलिसांनी याची माहिती दिली. तातडीने नानलपेठ पोलिसांचे पथक मनमाड येथे रवाना होऊन मुलींना ताब्यात घेतले. शुक्रवारी (ता.२९) सांयकाळी मुलींना परभणीत सुखरुप आणण्यात आले आहे.

नानलपेठ पोलिस ठाणे रात्रभर जागले
दोन मुली बेपत्ता असल्याने हादरलेले नानलपेठ पोलिस ठाणे पूर्णपणे हादरले होते. सहायक पोलिस अधिक्षक नितीन बगाटे, पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक एस.एस.सानप यांच्यासह ठाणे अंमलदार आर.आर. हक्क, पोलिस शिपाई श्री. बेटकार व श्री. सोनवणे यांनी पूर्ण रात्र जागूनच काढली. वारंवार सर्व पोलिस ठाणे, प्रत्येक रेल्वेस्थानकातील पोलिसांनी नानलपेठ पोलिसांचा संपर्क सुरूच होता.


घटना गंभीर होती 

आमच्यासाठी ती आव्हानात्मक होती. केवळ रेल्वेच्या आवाजाशिवाय आमच्याकडे काही ही माहिती नव्हती. परंतु, अखेर पाच तासामध्ये या मुली पोलिसांच्या ताब्यात सुखरूपपणे आल्या होत्या. पालकांनी आश्रू ढळण्याच्या आत मुलींना सुरक्षितपणे आणले याचे समाधान आहे. -नितीन बगाटे, सहायक पोलिस अधिक्षक.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com