औरंगाबाद - यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी परीक्षा 18 डिसेंबर ते 17 जानेवारीदरम्यान मोबाईल ऍपवर घेतली जात आहे; मात्र यामध्ये अनेक तांत्रिक अडथळे येत असून, विद्यार्थी संख्येएवढे मोबाईल आणायचे कुठून? हाही प्रश्न उपस्थित झाला आहे. परिणामी, शिक्षक त्रस्त झाल्याचे चित्र आहे.
शिक्षण विभाग आणि श्यामची आई फाउंडेशनच्या वतीने "महाकरिअर' या मोबाईल ऍपच्या मदतीने कलचाचणी घेतली जात आहे. यासाठी शिक्षकांना विभागस्तरावर आवश्यक प्रशिक्षणही दिले गेले. प्रात्यक्षिक परीक्षा जशा घेतल्या जातात, तशाप्रकारे विद्यार्थी गट तयार करून सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी, अशा सूचना मंडळाने दिल्या आहेत.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी "कलचाचणी व अभिक्षमता कसोटी' गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाभर सुरू आहे. यंदा मराठवाडा विभागातून एक लाख 86 हजार 66 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले आहेत. एवढी विद्यार्थीसंख्या लक्षात घेता इतके मोबाईल आणायचे कुठून, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. संगणकावर घेतलेली परीक्षा या वर्षी "मोबाईल ऍप'द्वारे घेतली जात आहे; मात्र मोबाईल ऍपद्वारे घेण्यात येणाऱ्या या कलचाचणीसाठी अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत.
या आहेत अडचणी
-विद्यार्थ्यांची यादी न दिसणे.
-ऍप इंस्टॉल न होणे.
-मोबाईलला नेटवर्क न मिळणे अथवा इंटरनेटची गती कमी असणे.
-विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत शाळेकडे स्मार्टफोन नसणे.
-विद्यार्थ्याला अँड्रॉइड फोन ऑपरेट न करता येणे
-सर्वच विद्यार्थी घरून मोबाईल आणू शकत नाहीत.
कलचाचणी हा सरकारचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. या उपक्रमाचे नियोजन संगणकावर जेवढे सोपे जाते, तेवढे मोबाईलवर करता येत नाही. कारण प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी मोबाईल उपलब्ध होईलच, याची शाश्वती नाही. तसेच फोन मिळाला तरी तो पाच इंचापेक्षा मोठा असावा.
- प्रकाश सोनवणे, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र मुख्याध्यापक संघटना
|