औरंगाबाद - मुलगाच हवा या मानसिकतेतून दर हजारी मुलींचे प्रमाण चिंताजनक असल्याने "मुलगी वाचवा, मुलगी शिकवा' अभियान सुरू करण्यात आले. याचा परिणाम म्हणून गेल्या चार वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे. चार वर्षांपूर्वी दर हजारी 919 असे लिंग गुणोत्तर होते. त्यात वाढ होऊन ते 981 इतके झाले आहे. हे प्रमाण बरोबरीने आणण्यासाठी मुलींच्या जन्मदरात वाढ होण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी "उज्ज्वल उद्यासाठी करा मुलीचे सक्षमीकरण' हे घोषवाक्य घेऊन "मुलगी वाचवा, मुलगी शिकवा' सप्ताह साजरा करण्यात आला.
मुलगा हा वंशाचा दिवा अशा पुरुषसत्ताक मानसिकतेतून मुलगी नको, असे म्हणणाऱ्यांचे प्रमाण काही वर्षांपूर्वी वाढले होते. यामुळे मुलांच्या तुलनेत मुलींची घटती संख्या चिंतेचा विषय बनली होती. वास्तविक पाहता आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना पुरुषांपेक्षा काकणभर सरस कामगिरी बजावीत आहे. असे असतानाही मुलींच्या जन्माचे फारसे स्वागत केले जात नसल्याने लिंग गुणोत्तरच्या प्रमाणात असमानता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर "मुलगी वाचवा, मुलगी शिकवा' हे अभियान राबविण्यात आले. स्त्रीभ्रूणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढवणे, मुलींना खात्रीचे शिक्षण व मुलींच्या जन्माची सुरक्षितता हा यामागचा हेतू आहे. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागामार्फत करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढले आहे.
2014-15 मध्ये जिल्ह्यात 81 हजार 839 बाळ जन्माला आले होते. त्यापैकी 42 हजार 654 मुले; तर 39 हजार 185 मुलींचे प्रमाण होते. दर हजार मुलांमागे हे प्रमाण 919 इतके होते. यात 2017-18 मध्ये चार वर्षांत समाजाच्या मानसिकतेत बदल होऊन 79 हजार 408 बाळांचे जन्म झाले त्यात 40 हजार 81 मुले, तर 39 हजार 327 मुली आहेत. हे प्रमाण दर हजारी 981 इतके असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
वर्ष | दर हजारी मुलांच्या तुलनेत मुलींचे जन्म |
2014 - 15 | 919 |
2015 - 16 | 929 |
2016 - 17 | 930 |
2017 - 19 | 981 |
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.