या मृतसाठ्यातील धरणात ७९ टक्‍के पाणीसाठा

isapur dam
isapur dam

कळमनुरी (जि. हिंगोली) : कळमनुरी तालुक्याच्या शिवेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील इसापूर धरणात आज मितीस ७९ टक्‍के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सिंचन विभागाने पाणी पाळ्यांचे योग्य नियोजन करणे गरजेचे झाले आहे. मात्र, अप्रशिक्षित व कंत्राटी कर्मचारी वर्गामुळे डाव्या व उजव्या कालव्यांमधून सोडण्यात येत असलेल्या पाण्यांचा मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे. 

पैनगंगा नदीवरील इसापूर धरणातून उन्हाळ्यात सोडण्यात आलेल्या पाणी पाळ्यांमुळे साठा खालावला होता. धरणामध्ये मृत पाणीसाठा शिल्लक राहिला होता. पावसाळ्याच्या सुरवातीला समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे यावर्षी धरणात मुबलक पाणीसाठा निर्माण होणार की, नाही, याची चिंता व्यक्त केली जात होती. परंतु, परतीच्या पावसाने चांगलीच मदत केली. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली. त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी धरणामधून मोठ्या प्रमाणावर तीन वेळेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. 

गतवर्षी पेक्षा यावर्षी बारा टक्याने वाढ
  
त्यामुळे धरणात समाधानकारक असा पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षी धरणात ६७.२५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता. यावर्षी ७९.४३ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. आजमितीस धरणाची पाणी पातळी ४३८.८१ मीटर असून एकूण पाणीसाठा १०८०.७९५० दलघमी आहे. उपयुक्त पाणीसाठा ७६५.८३१३ दलघमी आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक थांबली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत धरणात बारा टक्के पाणीसाठा अधिकचा जमा झाला आहे. 

पाणी पाळ्याचे नियोजन महत्वाचे 

त्यामुळे सिंचन विभागाने रब्बी हंगामाकरिता सोडण्यात येणाऱ्या पाणीपाळ्याचे नियोजन करण्याची हालचाल केली होती. मात्र, औरंगाबाद येथे कालवा सल्लागार समितीची बोलावण्यात आलेली बैठक ऐनवेळी रद्द केली. आता रब्बी हंगामासाठी पाणीपाळी सोडण्याची मागणी होत आहे. मात्र परतीच्या पावसामुळे शेतीमध्ये असलेला ओलावा पाहता शेतकऱ्यांनी गहू, हरभरा पिकास पसंती दिली आहे. उन्हाळ्यातील स्थिती लक्षात घेवून उजव्या व डाव्या कालव्यामधून सोडण्यात येणाऱ्या पाणीपाळ्यांचे काटकसरीने नियोजन करणे गरजेचे आहे. मागील काळात अनेक दिवसाच्या अनियमित पाणीपाळ्या सोडण्यात आल्यामुळे धरणातील साठा खालावला होता. 


कालव्याची दुरवस्था

इसापूर धरणाच्या कालव्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी झुडपे फुटली असून फरशीही निखळली आहे. अनेक ठिकाणी गाळ साचला आहे. यामुळे पाण्याची नासाडी होत आहे. आखाडा बाळापूर, शेवाळा भागातून जाणाऱ्या कालवा तर धोकादायक बनला आहे. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांतून रोष व्यक्त करत आहेत. मात्र, कालवा दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. या कालव्यांची दुरुस्ती, करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.   
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com