औरंगाबाद - नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला एक सप्टेंबरपासून सुरवात करण्यात येणार आहे. त्यासाठी जूनमध्ये कामाचा आदेश काढण्यात येणार असून, आंतरराष्ट्रीय निविदा असेल तर 2019 पर्यंत समृद्धी मार्ग पूर्ण करण्याचे लक्ष्य राहणार आहे. या महामार्गासाठी सर्व्हे करणे, खांब रोवणे, त्याचे मूल्यांकन झाल्यावरच मालमत्ताधारकांना नोटिसा दिल्या जातील. ही माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी सोमवारी येथे दिली.
ते म्हणाले, की समृद्धी महामार्ग हा दहा जिल्ह्यांतून जात असून, त्यात 27 तालुके, 381 गावांतील सुमारे दहा हजार हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. जमीन संपादित करण्यासाठी 2013 मध्ये केंद्र सरकारचा कायदा आलेला आहे. रस्त्यासाठी एकरकमी पैसा किंवा शेतकऱ्यांना विकसित टाउनशिपमध्ये 11 हजार चौरस फुटांचा प्लॉट दिला जाणार आहे. सध्या काही ठिकाणी सर्व्हे करताना विरोध होत आहे; मात्र सर्व्हे करण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही. मोजणी करून सर्व्हे केल्याशिवाय आम्हाला मूल्यांकन काढता येणे शक्य नाही.
चार हजार कि.मी.चे जोडरस्ते
नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाला इतर चार हजार किलोमीटरचे रस्ते जोडले जाणार आहेत. हे जोडरस्ते सिमेंट- क्रॉंक्रीटचे असतील. त्यामुळे रस्त्यांचे मोठे जाळे निर्माण होईल. राज्यात सध्या 50 हजार किलोमीटरचे राज्य महामार्गाचे रस्ते आहेत.
|