अंबड : गेल्या पाच वर्षात राज्यातील तरुणांना बेरोजगार व शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे महापाप भाजप-शिवसेनेच्या सरकारने केले आहे. त्याचा हिशोब चुकता करण्याची वेळ आता आली आहे. सूज्ञ मतदार बंधू भगिनींनो युती सरकारला त्यांची जागा दाखवून महाआघाडीला द्या, असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.
बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार बबलू उर्फ रुपकुमार चौधरी यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता.15) अंबड शहरातील महावीर चौकात आयोजित सभेत बोलत हाेते. यावेळी घनसावंगी विधानसभेचे उमेदवार राजेश टोपे, माजी आमदार अरविंद चव्हाण, आर.आर.खडके, भीमराव डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य बाप्पासाहेब गोल्डे, उमेदवार बबलू चौधरी, राजू आखाडे, उपनगराध्यक्ष केदार कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, की युतीचे सरकार हे फसवे आहे. त्यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, की मेगाभरतीचे काय झाले? उद्योगधंदे बंद पडले. लाखो बेरोजगार झाले. राज्यातला स्वाभिमान कोठे आहे, तरुणांच्या बाबतीत आज नोकरी नाही, तर छोकरी नाही, अशी अवस्था होऊन बसली आहे. शरद पवार यांना राज्यातील तरुणांच्या भविष्याची दिवसरात्र चिंता आहे. यामुळे विकासाचा ध्यास व सर्वसामान्य जनतेच्या हिताची रक्षण करणारा जाणता राजा शरद पवार यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.
याप्रसंगी आमदार राजेश टोपे बोलताना म्हणाले, की बबलू चौधरी यांनी सलग चौदा वर्ष संघर्ष केला. ते सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे आहेत. प्रचंड बहुमतांनी त्यांना निवडून देण्याचे आवाहन आमदार राजेश टोपे यांनी केले आहे.
यावेळी श्रीरंग बापू पैठणे, विठ्ठलसिंह राजपूत, चंद्रकांत दिलपाक, समद बागवान, शिवप्रसाद चांगले, अफरोज पठाण, संभाजी गुढे कादरी, श्रीरंग जाधव, सलीम बागवान यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.