औरंगाबाद : महापालिकेने लावले वीज बचतीचे 'दिवे'!

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - ऐपत नसताना महापालिकेने सुमारे 120 कोटी रुपयांचा एलईडी प्रकल्प हाती घेतला आहे. संपूर्ण शहरात एलईडी दिवे लावल्यानंतर मोठी वीज बचत होणार, असा दावाही प्रशासनातर्फे करण्यात आला. मात्र, 40 हजारांपैकी 35 हजार 700 दिवे बसविल्यानंतरही केवळ 10 टक्केच वीज बचत झाल्याचे समोर आले आहे. महापालिकेला 27 टक्के वीज
बचत अपेक्षित होती. कंत्राटदाराला उर्वरित दिवे बसविण्यासाठी आता महिनाभराचा वेळ देण्यात आला आहे. 

शहरातील जुने पथदिवे बदलून त्याठिकाणी वीज बचतीचे एलईडी पथदिवे लावण्याचे 120 कोटींचे कंत्राट महापालिकेने इलेक्‍ट्रॉन एनर्जी इफिसिएन्सी सर्व्हिसेस या कंपनीला दिले आहे. एक सप्टेंबर 2016 ला कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आले; मात्र प्रत्यक्षात वर्षभरानंतर कामाला सुरवात झाली. आतापर्यंत कंपनीने 40 पैकी 35 हजार 700 दिवे लावले आहेत; तर 1200 पैकी 800 पॅनेल जोडण्यात आले आहेत. एलईडी प्रकल्पाबाबत नगरसेवकांनी वारंवार आक्षेप घेत कंपनीने लावलेले दिवे अवघ्या आठवडाभरात बंद पडत असल्याचा आरोप केला. त्यावर आयुक्तांनी चौकशीही केली; मात्र कारवाई झाली नाही. दरम्यान, प्रकल्प पूर्णत्वाकडे जात असताना, नेमकी विजेची बचत किती झाली? महापालिकेला येणाऱ्या बिलात कपात झाली का? याचे उत्तर प्रशासनाकडे नव्हते. नगरसेवकांच्या मागणीप्रमाणे दिवे लावले जात असून, ते पॅनेल टू पॅनेल लावणे गरजेचे होते, असे कारण प्रशासनाने शोधून काढले. त्यामुळे आयुक्तांनी पॅनेल जोडण्याचे आदेश दिले. आतापर्यंत 800 पॅनेल जोडल्यानंतर केवळ 10 टक्के विजेची बचत झाल्याचे शनिवारी (ता.21) झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना सांगितले. 800 पॅनेल जोडल्यानंतर प्रशासनाला 27 टक्के वीज बचत अपेक्षित होती. त्यामुळे प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह
उपस्थित केले जात आहेत. 

कंत्राटदाराला  एका महिन्याची मुदत 

काम पूर्ण करण्यासाठी एका वर्षाची मुदत देण्यात आली होती. मुदत संपली असली तरी काम सुरूच असून, महिनाभरात उर्वरित दिवे लावणे व पॅनेल जोडण्याचे काम केले जाणार आहे. त्यानंतरच किती वीज बचत झाली हे समोर येईल, असे महापौरांनी सांगितले. 

20 हजार दिव्यांचा  नवा प्रकल्प 
120 कोटींच्या एलईडी प्रकल्पाचे काम सुरू असतानाच आता नव्या एजन्सीची 20 हजार एलईडी दिवे बसविण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी मात्र महापालिकेला पैसे देण्याची गरज नाही. केंद्र शासनाच्या अनुदानातून हे दिवे बसविले जाणार असल्याचे सांगण्यात आले. 
  
आठ हजार फिटिंग जळाल्या 
एलईडी प्रकल्पाच्या कंत्राटदाराच्या गोदामाला नुकतीच आग लागली होती. त्यात महापालिकेच्या जुन्या आठ हजार 200 फिटिंग जळाल्या आहेत. कंत्राटदाराचे पैसे देताना या फिटिंगची
रक्कम कपात केली जाणार आहे. 
 
आकडे बोलतात... 

  •  देखभाल दुरुस्तीसह प्रकल्प किंमत :120 कोटी 
  • एकूण पथदिव्यांची संख्या : 40 हजार 
  • आतापर्यंत बसविण्यात आलेले दिवे : 35 हजार 700 
  • महापालिकेने दिलेले बिल : सुमारे 38 कोटी रुपये 
  • कामे पूर्ण झालेले प्रभाग : 4, 5, 6, 7 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com