हजारोंच्या जरबेरा फुलांची होतेय नासाडी

कुन्हाळी (ता. उमरगा) : उठाव नसल्यामुळे पॉलिहाऊसमधील जरबेरा फुलांची होत असलेली नासाडी.
कुन्हाळी (ता. उमरगा) : उठाव नसल्यामुळे पॉलिहाऊसमधील जरबेरा फुलांची होत असलेली नासाडी.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : तालुक्यातील कुन्हाळी येथील एका शेतकरी महिलेने आधुनिक शेतीतंत्राचा अवलंब करून कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न घेण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू केला होता. मात्र लॉकडाऊन झाल्याने वाहतूक व्यवस्था आणि बाजारपेठही बंद झाली. परिणामी गेल्या दहा दिवसांपासूनची जरबेरा फुलांची तोड वाया गेली. मजुरीचा आर्थिक भुर्दंड अन्‌ मेहनतीवरही पाणी पडले. शिवाय ५० हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.

कृषी विभागाच्या अनुदान तत्त्वावरील पॉलिहाऊसची उभारणी करून गेल्या चार वर्षांपासून वैशाली कैलास आष्टे जरबेरा फुलांचे उत्पन्न घेत आहेत. सहा ते सात महिन्यांपासून दहा गुंठे क्षेत्रात जरबेरा फुलांचे उत्पन्न घेतले जात होते. त्यातून जवळपास तीन लाख रुपये मिळाले होते. 

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असताना पाण्याचे स्रोत उपलब्ध करून कमी पाण्यावर अधिक उत्पन्न देणारे पीक घेण्यासाठी कुन्हाळीच्या शेतकरी वैशाली आष्टे यांनी प्रयत्न केला. २०१४ मध्ये साडेबारा लाख रुपये खर्च करून पॉलिहाऊसची उभारणी केली. त्यात कृषी विभागाने सव्वाचार लाखांचे अनुदान दिले होते. पॉलिहाऊसमध्ये पहिले उत्पन्न जरबेरा फुलांचे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. जरबेरा फुलांच्या रोपाची एकदा लागवड केल्यानंतर त्यातून तीन वर्षे फुले मिळतात. एका रोपाला वर्षभरात ६५ ते ८० फुले लगडतात.

पॉलिहाऊसच्या १० गुंठे क्षेत्रात साधारणतः तीन वर्षे उत्पन्न घेतल्यानंतर श्रीमती आष्टे यांनी पुन्हा एक ऑक्टोबर २०१८ मध्ये पुणे येथून दोन लाख २८ हजार किंमतीची सहा हजार २५० जरबेरा फुलांची रोपे आणून त्याची लागवड केली. २५ डिसेंबर २०१९ पासून प्रत्यक्ष फुले विक्रीसाठी सुरू झाली आणि दररोज आठशे ते नऊशे फुलांचे उत्पन्न सुरू झाले. प्रतिफुलास दोन ते आठ रुपयांपर्यंत दर मिळतो. या फुलांसाठी हैदराबादची बाजारपेठ आहे; परंतु लॉकडाऊनमुळे तेथील बाजारपेठ बंद आहे. शिवाय लग्नसराईतच लॉकडाऊन झाल्याने मंगल कार्यालयासह घरासमोरील मोठ्या शामियानात होणारी लग्ने थांबल्याने स्टेज सजावटीसाठी लागणाऱ्या फुलांची मागणीही थांबली.

२० मार्चपासून सर्वत्र बंद असल्याने फुलांची मागणी चक्क घटली. परंतु आलेली तोड तरी थांबवता येत नाही. मजूर लावून फुलांची तोडणी केली आणि जागेवरच त्या फुलांची नासाडी सुरू झाली आहे. दहा ते बारा दिवसांत जवळपास बारा ते चौदा हजार फुले जागेवरच पडून आहेत. साधारणतः तीन रुपये दराने एका फुलाला दर मिळाला असता तरी जवळपास चाळीस ते पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे. 

लॉकडाऊनमुळे जरबेरा फुलांच्या विक्रीला ब्रेक लागला आहे. दररोज दोन ते तीन हजार रुपये फुलांच्या विक्रीतून मिळत होते. आता गेल्या बारा दिवसांपासून उठावच बंद झाला आहे. परिपक्व झालेल्या फुलांची तोड तर करावीच लागते. त्यासाठी दररोज पाचशे रुपये मजुरीचा खर्च येतो. सध्या मागणी नसल्याने तो खर्च वाया जात आहे. शिवाय खत, पाण्याची सोय तर नियमित करावी लागते. आता आणखी तीन दिवसांनी फुलांची तोड करावी लागते, तीही लॉकडाऊनमुळे वायाच जाणार आहे. 
- वैशाली आष्टे, शेतकरी, कुन्हाळी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com