सह्याद्री अन् गड किल्ल्यांनी शोभतो, अभिमानाने माझा महाराष्ट्र डोलतो

file photo
file photo

उमरगा (जि. उस्मानाबाद) : कोरोनामुळे सद्य:स्थितीत प्रत्यक्ष कविसंमेलन घेणे शक्य नसल्याने येथील लेखक-कवींनी तयार केलेल्या 'माझी कविता' या व्हाॅटस्अॅप ग्रुपतर्फे शुक्रवारी (ता. एक) महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आॅनलाईन कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.

एकुण पंच्याहत्तर कविंचा ग्रुप असलेल्या या समुहातील तब्बल तीस कविंनी या कविसंमेलनात आपला सहभाग नोंदवला. महाराष्ट्राचे गुणगान गाणाऱ्या एकापेक्षा एक सरस कविता या वेळी कविंनी सादर केल्या. 'माझी कविता' या ग्रुपची सुरवात करणारे कवी बालाजी मदन इंगळे यांनी 'माझा महाराष्ट्र' ही कविता सादर केली.

महाराष्ट्राची थोरवी वर्णन करणारी ‘सह्याद्री अन् गड किल्ल्यांनी शोभतो, अभिमानाने माझा महाराष्ट्र डोलतो’ ही कविता सादर केली. तर कवी राम पांचाळ यांनी 'जय जय महाराष्ट्र देशा' ही कविता सादर केली. महाराष्ट्राची वैशिष्ट्ये त्यांनी आपल्या कवितेतून मांडली. महाराष्ट्र भूमीचे गुण गाताना ते म्हणाले, की, ‘अनंत जीवन फुलवत आहे, कृष्णा-तापी-गोदावरी, गड धुरंदर मिरवत आहे, स्वराज्य रक्षक सह्यगिरी उद्वेग शौर्याचा चेतवित आहे. गडगडल्या ह्या दाहिदिशा, जय जय महाराष्ट्र देशा...’ 

कवी कमलाकर भोसले यांनीही महाराष्ट्राची ख्याती आपल्या कवितेतून वर्णिली. महाराष्ट्राची सामाजिक व भौतिक वैशिष्ट्ये कवितेतून सहजपणे मांडताना ते म्हणाले, की 'संतांच्या अनेक विभूती, अष्टविनायकाची ख्याती, शिवबाचे इथे शाहीर, बाबासाहेबांच्या लेखणीची धार, या महाराष्ट्रात माझ्या...' 
कवयित्री रेखा सूर्यवंशी यांनी 'महाराष्ट्र ,माझा' ही कविता सादर केली. महाराष्ट्राचे भारत देशातील स्थान कसे वरच्या दर्जाचे आहे हे सांगताना आपल्या कवितेत त्या म्हणाल्या, की 'भारत भूचा जणू आरसा,  संस्कृतीचा जपे वारसा, महाराष्ट्र माझा.. '

कवी विश्वनाथ महाजन यांनी गीताच्या रूपाने महाराष्ट्राची महती गाणारी रचना सादर केली. आपल्या कवितेत ते म्हणाले, की 'संतांची ही जननी सहिष्णुतेची गाणी, ज्ञाना नाथा मुक्ता, तुक्याची अभंग वाणी, 
विचारांची ही असे भूमी, महाराष्ट्र माझा... '
कवयित्री नेहा माने यांनी महाराष्ट्राची गाथाच आपल्या कवितेतून गायिली. 'महाराष्ट्राची गाथा' या आपल्या कवितेत त्या म्हणाल्या , '‘काय सांगू मी माझ्या महाराष्ट्राची गाथा, ऐकून नतमस्तक होतो लहान थोरांचा माथा’ 

कवी शिवराम अडसुळे यांनीही कविता सादर केली. शूरांचा, विरांचा महाराष्ट्र कसा आहे हे आपल्या कवितेमधून त्यांनी मांडले. 'वीरांचा महाराष्ट्र' या कवितेत ते म्हणाले, 'शिवरायांचा महाराष्ट्र, बलवान महाराष्ट्र, विरांचा महाराष्ट्र, शौर्यवान महाराष्ट्र'

महाराष्ट्राचे गुणगान गाणाऱ्या कविता या वेळी कविंनी सादर केल्या. काही कविंनी सामाजिक, राजकीय आशय व्यक्त करणाऱ्या कविता सादर केल्या. आपापल्या घरी बसून कविंनी या कविसंमेलनाचा आनंदही घेतला. या कविसंमेलनामध्ये योगिराज माने, सुधीर कांबळे, प्रमोद माने, राजेंद्र माळी, सुमन पवार, संजय काबडे, प्रा. लक्ष्मण बिराजदार, श्री. देशमाने , हनुमंत देशमुख, शंकर मुगळे, अनिता मुरकुटे, भावना नान्नजकर, पार्वती माशाळकर, रमेश ममाळे, शशिकला राठोड, अमोल मुळे, पुष्पा क्षीरसागर, भारत कांबळे, गिरीधर गोस्वामी, रुपचंद ख्याडे, रामदास कांबळे, तनुजा ख्याडे, प्रा. एन.जे. पवार, परमेश्वर सुतार आदी कविंनीही या आॅनलाईन कविसंमेलनात सहभाग घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com