लातूर जिल्ह्यात पावसाळ्यापर्यंत पाणीटंचाई नाही

Water
Water

लातूर - परतीच्या पावसाने झटका दिल्यामुळे शहर व जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे; मात्र येत्या पावसाळ्यापर्यंतही पाणी पुरेल की नाही, याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. त्यांना पूर्णविराम देत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शहर व जिल्ह्यात येत्या पावसाळ्यापर्यंत पाणीटंचाई भासणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. मांजरा धरणातही सुमारे ४५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असल्याने शहरालाही पावसाळ्यापर्यंत टंचाईची भीती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. १९) आयोजित रब्बी हंगाम कालवा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार ॲड. त्र्यंबक भिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातुरे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, उपजिल्हाधिकारी (बीड) महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हाधिकारी (उस्मानाबाद) संतोष राऊत यांच्यासह अधिकारी व समितीचे सदस्य उपस्थित होते. मांजरा धरणासोबत जिल्ह्यातील अन्य प्रकल्पांतून पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी पाणीटंचाईची काळजी करू नये, असे आवाहन करीत पाण्याची काटकसर करावी, तसेच महानगरपालिकेने पाण्याची गळती तातडीने थांबवून नळांना मीटर बसविण्याची सूचनाही त्यांनी केली.

पाणीटंचाई आणि वितरण
  टंचाईचे आराखडे तातडीने सादर करा
  प्रकल्पातील पाण्याचा अनधिकृत उपसा रोखा
  अमृत योजनेची कामे मुदतीत करून घ्या
  टंचाईची कामे करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा
  निम्नतेरणा व घरणीतून तीन पाळ्यांत पाणी

पाणी तोडल्याची चौकशी करा
एमआयडीसीमध्ये उद्योगाबरोबरच केंद्रीय राखीव दल, समाजकल्याणचे विद्यार्थी वसतिगृह, हॉस्पिटल व शाळा आहेत. यात उद्योगांना कमी पाणीपुरवठा होतो. ही वस्तुस्थिती पाणी तोडण्यापूर्वी जलसंपदा विभागाने का पाहिली  नाही, अशी विचारणा करून पाणीपुरवठा तोडल्याप्रकरणी चौकशी करून अहवाल द्यावा, असे आदेश पालकमंत्र्यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांना दिले.

अमृतचे काम संथगतीने
शहरातील अमृत योजनेचे काम संथगतीने सुरू असून हे काम वेगाने पूर्ण झाल्यास शहरातील सर्व भागांना सुरळीतपणे पाणीपुरवठा होऊ शकतो, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले. पाण्याच्या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेची स्वतंत्र बैठक घ्यावी, अशी सूचना डॉ. गायकवाड यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com