औरंगाबाद : पावसाळा सुरू होण्यासाठी केवळ 20 दिवस शिल्लक असताना प्रशासनाने शहरातील नालेसफाईची निविदा प्रसिद्ध केली आहे. 1 कोटी 68 लाख रुपयांची यंत्र सामग्री भाड्याने घेऊन शहरातील नाले सफाई केली जाणार असून, निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मात्र पावसाळा सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे हा निधी गाळात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहरातील नालेसफाईवर महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. मात्र त्यासाठी जाणीवपूर्वक विलंब केला जातो. उन्हाळ्यातच नालेसफाईची कामे होणे अपेक्षित असताना यंदाची निविदा प्रसिद्ध करण्यात अर्धा मे महिना संपला आहे. 24 तारखेला निविदा भरण्याची अंतिम तारीख असून, 27 मेला या निविदा उघडल्या जाणार आहेत. कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देईपर्यंत जून महिना उजाडणार आहे. तोपर्यंत एकदा मोठा पाऊस झाल्यास आपोआप नाल्यांची सफाई होऊन कंत्राटदाराला काम न करताच फायदा होणार आहे. प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीने महापालिकेचे कामकाज सुरू आहे. थातूर-मातूर कामे करून कंत्राटदार नाल्याची गाळ काढून काठावर टाकतो. गाळ वाळल्यानंतरच तो उचलला जाईल, असे सांगितले जाते मात्र पावसाला सुरवात होताच काठावरचा गाळ पुन्हा नाल्यात जातो. त्यामुळे जुन-जुलै महिन्यात मोठे पाऊस होताच नाले तुंबून शेकडो घरात पाणी घुसण्याचे प्रकार दरवर्षी घडत आहेत.
गतवर्षी दोघांचा मृत्यू -
गतवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीलाच शहरात दोघांचा मृत्यू झाला होता. सिडको भागात एका तरुणाचा तर जयभवानी नगरात एका मजुराचा नाल्यात पडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र अद्याप जय भवानीनगरातील नाल्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा जयभवानीनगरचा विषय गाजण्याची शक्यता आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.