उस्मानाबाद : यंदा ४२ टक्के पीक कर्ज वाटप; प्रशासनाचा वचक, बॅंकांच्या मुजोरीवर चाप  

crop loan.jpg
crop loan.jpg

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये पीक कर्जाचे वितरण अत्यंत चांगल्या पध्दतीने सुरु असून गेल्या काही वर्षांपासुन बँकाची जी मुजोरी वाढली होती, ती यंदा काही प्रमाणात कमी करण्यात लोकप्रतिनिधीसह प्रशासनाला यश मिळाले आहे.

सामूहीकरित्या सक्षमपणे व प्रामाणिकपणे काम केल्यास त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो. याचे चांगले उदाहरण यंदा दिसू लागले आहे. यावेळी जिल्ह्यात ४२ टक्के कर्ज वाटप आतापर्यंत करण्यात आले आहे. त्यातही खासगी बँकानी ३२ टक्के एवढे कर्ज वाटप केले आहे. जे दरवर्षी २० टक्क्याच्या आतच असते.

बँकावर कोणत्याच यंत्रणेचे नियंत्रण नसल्याने दरवर्षी पीक कर्ज वाटपाबाबत शेतकरी वर्गात नाराजी असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असलेल्या योजनेचाही त्याना फायदा होत नव्हता. जिल्हा बँक वगळता इतर सर्वच बँका पीक कर्ज देताना हात आकडता घेत होत्या. लोकप्रतिनिधींचा वचक प्रशासनावर असल्यास त्यामध्ये निश्चितपणे फरक पडतो. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यानी बँक अधिकाऱ्यांच्या जिल्हाप्रशासनाच्या समवेत बैठका घेतल्या. 

शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत प्रत्येक बैठकीत सूचना दिल्याने बँकावरही काही प्रमाणात नियंत्रण आले. प्रशासनाच्या पुढाकाराने गावातील विकास सोसायटीच्या सचिवाकडे कागदपत्रे देऊन त्यांच्याकडे बँकानी पोहच देण्याची प्रक्रियेने देखील वेग घेतला. हा पर्याय स्विकारून ज्या बँका पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत होत्या. त्यांच्यावर अंकुश बसल्याचे दिसुन आले आहे. 

खासदार राजेनिंबाळकर यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये तेथील बँक अधिकारी व प्रशासनाला सोबत घेऊन बैठका घेतल्या. त्याचाही प्रभाव बँकावर पडल्याचे दिसुन आले आहे. त्यामुळे सामुहीकरित्या एखादी मोहीम हाती घेतल्यास त्याला हमखास यश मिळते हे पुन्हा सिध्द झाले आहे. 

दोन वेळा कर्जमाफी मिळाल्याने आता बँका शेतकऱ्यांना कर्ज देणार नाहीत. असे गृहित धरले जात होते. शिवाय सूरुवातीला बँकाची सुद्धा भूमिका अशीच होती. हे ओळखूनच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना अत्यंत अडचणीच्या काळात कर्ज उपलब्ध करुन देण्यास मदत केली आहे.

दरवर्षी २५ ते ३० टक्केच असणारे पीक कर्ज वाटप यंदा ४२ टक्क्यापर्यंत वाढल्याने समाधान व्यक्त होत आहे. अजूनही हे प्रमाण वाढुन ते ५० टक्केच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत कर्ज वाटपाची प्रक्रीया सूरुच राहणार आहे.  
विश्वास देशमुख, जिल्हा उपनिबंधक

संपादन-प्रताप अवचार 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com