पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न मार्गी लागणार

पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न मार्गी लागणार

उस्मानाबाद - शहरातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर चर्चा करण्यासाठी जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता शुक्रवारी (ता.१४) पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न मार्गी लागण्याची शक्‍यता आहे. शहरातील नागरिकांना समान दाबाने मुबलक पाणी देण्याची मागणी शहरातील नागरिकांतून होत असून मुख्य अभियंता काय भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

अटल अमृत योजनेअंतर्गत शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी जीवन प्राधिकरणास सल्लागार म्हणून शासनाने नियुक्त केले आहे. यात पाण्याचा स्रोत, जलवाहिनी, प्रत्येक घरापर्यंतची नळजोडणी आदी बाबींचा समावेश आहे. 

पुरेशा दाबाने पाणी मिळण्यासाठी हायड्रॉलिक मॉडेलिंग करणे आवश्‍यक आहे; परंतु प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. 

प्रत्यक्ष नागरिकांच्या घरी जाऊन सर्व्हेक्षण होणे गरजेचे होते; परंतु बनावट आकडेवारी दाखवून सर्वेक्षण पूर्ण केल्याचा आरोप नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केला होता. गेल्या वर्षापासून पालिका आणि जीवन प्राधिकरणात या प्रश्‍नावरून वादंग आहे. जिल्हा स्तरावरील प्राधिकरणाचे हायड्रॉलिक मॉडेलिंगच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेर मुख्य अभियंत्यांना चर्चा करण्यासाठी       शहरात यावे लागत असल्याची चर्चा आहे.

हायड्रॉलिक मॉडेलिंग न करताच शहरात अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचा प्रयत्न होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. तेरणा प्रकल्प, तसेच रुईभर येथून शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या जलवाहिन्या कालबाह्य झाल्या असतानाही सुस्थितीत असल्याचा अहवाल प्राधिकरणाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी तयार केल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

दरम्यान शुक्रवारी मुख्य अभियंता याबाबत काय निर्णय घेतात, याची उत्सुकता शहरातील नागरिकांना लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com