त्या होम क्वारंटाइन शिक्काधाऱ्यांना रोखा...

File photo
File photo

बेंबळी (जि. बातमीदार) : उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी, केशेगाव व पाटोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या एकूण ३९ गावांतून मुंबई, पुणे आणि दिल्ली या शहरांत कामासाठी गेलेले सुमारे चार हजारांपेक्षा अधिक नागरिक गावाकडे परतले आहेत. त्यापैकी अनेकांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारलेले आहेत. तरीही हे नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरत असल्याने एका गावच्या ग्रामसेविका, पोलिस पाटील व उपसरपंच यांनी संबंधितांना समज द्यावी, अशा आशयाचे पत्र पोलिसांना दिले आहे.

बेंबळी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या ११ गावांत एक हजार ३२७, केशेगाव केंद्राअंतर्गतच्या १७ गावांत एक हजार ४१९, तर पाटोदा केंद्राअंतर्गतच्या अकरा गावांत एक हजार १९० असे एकूण तीन हजार ९३६ लोक शहरातून गावांत दाखल झाले आहेत. त्यापैकी अनेकांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारलेला आहे. बाहेर वावरताना तो शिक्का इतरांच्या नजरेस पडल्यास त्यांना घराबाहेर पडू नये, असा आग्रह केला जात आहे. तरीही काही शिक्काधारी बाहेर वावरत असल्याने ठिकठिकाणी तणाव, भीती निर्माण होत आहे.

केशेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत एकूण १४ गावे आहेत. यापैकी धारूर येथे पुणे, मुंबई येथून आलेल्या लोकांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारलेला आहे. तरीही यातील काही लोक सार्वजनिक ठिकाणी वावरत आहेत. त्यांना समज द्यावी म्हणून धारूरच्या ग्रामसेविका अमरजा शेखदार, पोलिसपाटील सुनील शिंदे, उपसरपंच गणेश जगताप, ग्रामपंचायत सदस्य कांचन गायकवाड, तानाजी गायकवाड, रवी रोकडे यांनी गावाबाहेरून आलेल्या या लोकांना घरातच राहण्याची समज देण्यात यावी, अशा आशयाचे पत्र बेंबळी पोलिसांना शुक्रवारी (ता. २७) दिले आहे. 

दरम्यान, बेंबळी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मुस्तफा शेख यांनी धारूर येथील लोकांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेत धारूर येथे स्वत: जाऊन संबंधितांची प्रत्यक्ष भेट घेतली. जीवनावश्यक वस्तूंची सोय करताना इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत समज दिली आहे. 
- सुनील शिंदे, पोलिस पाटील 

जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात तपासणी केलेल्या प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारला जातो. आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातून येणाऱ्या प्रवाशांना हा शिक्का मारलेला नाही; मात्र शहरातून गावाकडे आलेल्या नागरिकांच्या नोंदी ठेवण्यात आल्या आहेत. शिक्का मारलेले लोक संशयित रुग्ण अजिबात नाहीत. त्यांनी फक्त होम क्वारंटाइन म्हणजे १४ दिवस विलगीकरणाची दक्षता घ्यावी. 
- डॉ. अमोल सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी, बेंबळी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com