उस्मानाबाद : कोरोनाचे दोन दिवसांत तीन बळी, एका संशयिताचाही मृत्यू

file photo
file photo

उस्मानाबाद : जिल्ह्यात दोन दिवसांत कोरोनाने एका युवकासह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एका संशयित रुग्णाचा रविवारी (ता. १४) दुपारी मृत्यू झाला आहे. या युवकाचा स्वॅब अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल. कोरोनावर मात करीत बरे होउन घरी परतलेल्या कारी (ता. उस्मानाबाद) गावातील ७५ वर्षीय वृद्धाचा आज दुपारी मृत्यू झाला. त्यांना अनेक दुर्धर आजारांनी ग्रासलेले होते.

शनिवारी (ता. १३) रात्री उस्मानाबाद शहरातील उस्मानपूरा परिसरातील कोरोनाबाधीत एकाचा मृत्य झाला होता. त्यानंतर रविवारी (ता. १४) सकाळी शहरातील आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना उस्मानाबाद तालुक्यातील कारी गावातील एका वृद्धाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले. कोरोनाची बाधा झाल्याने या वृद्धाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सोळा दिवसांच्या उपचारानंतर कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र आज त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, आज दुपारी एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कळंब तालुक्यातील पाथर्डी गावात पाहुणा आलेला हा युवक हायरिस्क भागातून परतला होता. त्याला काविळ आजाराने ग्रासलेले होते, असे समजते. दरम्यान, कोरोनाची लक्षणे आढळल्याने दोन दिवसांपूर्वी त्याला कळंब उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या युवकाचा मृत्यू कोणत्या आजाराने झाला हे अहवाल आल्यानंतरच समजणार आहे. गेल्या चोवीस तासांत उस्मानाबाद जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी तिघांचा कोरोनाने बळी गेला आहे. 

जिल्ह्यामध्ये संशयितांची संख्या ७,५५३ एवढी असून, त्यातील ७,५२९ नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. ६,४७९ होम क्वारंटाईन, तर १,०५० नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. आतापर्यंत ५,१३१ जणांनी चौदा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. १,६५८ एवढ्या नागरिकांना घरी पाठविण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसून येत असले तरी कोरोना बळीचा आकडा सहावर पोचला आहे. 

जिल्ह्यामध्ये शनिवारपर्यंत २२०२ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातील १४५ जणांचे अहवाल पॉझीटिव्ह आले होते. त्यातून १०४ जण बरे होउन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत उस्मानाबाद शहरात सर्वाधिक ५६ रुग्ण आढळले असून, आज सकाळी कोरोनाने शहरात दुसरा बळी गेल्याने चिंता वाढली आहे.

लातूरमध्ये उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधित गर्भवती मातेच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यामध्ये १४५ पैकी पाच बाधित रुग्ण हे परजिल्ह्यामध्ये ले असले तरी त्यांचा समावेश जिल्ह्याच्या आकडेवारीमध्ये करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com