Paithan : यंदा पाणीटंचाईचे नो टेंशन

एप्रिल सुरू झाला तरी पंचायत समितीकडे टॅंकरची मागणी नाही
Jayakwadi project
Jayakwadi projectsakal

पैठण : एकेकाळी जानेवारी महिना सुरू झाला की टँकर सुरू करा, अशी मागणी पैठण तालुक्यातील ग्रामीण भागातून होत असायची. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून हे चित्र बदलले आहे. गत वर्षाप्रमाणे यंदाही तालुक्यात पाणीपातळी चांगली टिकून राहिली आहे.

परिणामी, एप्रिल सुरू होऊनही अद्याप तालुक्यातील एकाही गावाने पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी केली नसल्याची माहिती पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे भर कडक उन्हाळ्यात ही पैठण तालुका पाणी टंचाईपासून दूर आहे.

तालुक्याच्या सर्व भागात जानेवारी अथवा मार्चमध्येच टँकरची मागणी होत होती. मात्र, गतवर्षी झालेला समाधानकारक पाऊस, ओढे-नाले, विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी टिकून आहे. त्यामुळे यंदाही तालुका टँकरमुक्त राहील, असे दिलासादायक चित्र आहे. जिल्ह्यात सर्वाधिक टॅंकर लागणारा तालुका, अशी पैठणची ओळख होती.

परंतु, तालुक्यात झालेली जलसंधारणाची कामे, गावाने केलेले सामूहिक प्रयत्न आदींमुळे ही ओळख पुसण्यात यश मिळाले आहे. यापूर्वी दर उन्हाळ्यात ते ३५ ते ४० गावांतील सुमारे ६० हजार नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असे. टँकरची शंभरी पैठण तालुक्यात पार होत असायची. पंचायत समिती आणि शासकीय स्तरावर, खासगी, शासकीय टँकर पुरवीत होते. कायम दुष्काळी भाग म्हणून तालुक्यातील सुमारे ४० ते ४५ गावे कायमच चर्चेत असत.

मात्र, गेल्या तीन वर्षांपासून स्थिती बदलली आहे. या भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. गावे टँकरमुक्त झाल्याने ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी धावपळ आणि त्यातून होणारे वाद थांबले आहेत. मे महिन्यात टँकरची आवश्यकता पडेल, असा ग्रामस्थांचा अंदाज असला तरीही सध्या मात्र, तालुका टँकरमुक्त आहे.

एप्रिल महिना सुरू होऊनही अद्याप तालुक्यातील एकाही गावाने पाण्याच्या टँकरची मागणी केली नाही, ही समाधानाची बाब आहे. अशी माहिती पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख राजेश कांबळे यांनी दिली.

नाथसागरात ही मुबलक पाणी साठा!

जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणातून गेल्या तीन वर्षापूर्वी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यात येत होता. नाथसागर धरणाच्या पाणीसाठ्यामुळे संपूर्ण पाणी टंचाईचा उन्हाळा या पाण्यावर अवलंबून असे.

परंतु गेल्या तीन वर्षात नाथसागर धरणातून पाणी घेणे बंद आहे. तर धरण शंभर टक्के भरून वाहिल्याने गोदावरीत पूर परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे गोदाकाठची शेती सुजलाम् सुफलाम् झाली आहे. तर तालुक्यातील इतर भागात पण पर्जन्यमान चांगले राहिल्याने पाण्याची कमतरता भासली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com