आयारामांपेक्षा नविन कार्यकर्ते निर्माण करा : नवाब मलिक 

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने नवनियुक्त पालकमंत्री नवाब मलिक यांचा परभणी येथे सत्कार
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने नवनियुक्त पालकमंत्री नवाब मलिक यांचा परभणी येथे सत्कार

परभणी : राजकीय क्षेत्रात सध्या आयारामांची संख्या वाढता आहे. सत्ता आली की पक्षात आयारामांची संख्या वाढत असते. त्यामुळे या आयारामापेक्षा नविन कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून पक्ष संघटना मजबुतीकरणासाठी त्यांचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने नवनियुक्त पालकमंत्री नवाब मलिक यांचा सत्कार व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन शनिवारी (ता.२५) करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी हे होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाबाई विटेकर, माजी खासदार सुरेश जाधव, संतोष बोबडे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा भावना नखाते, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

या वेळी बोलतांना पालकमंत्री नवाब मलिक म्हणाले, राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर अल्पसंख्याकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. कर्जमाफीपासून वंचित असणाऱ्या इतर शेतकऱ्यांसाठीदेखील पुढील काळात वेगळी योजना कार्यान्वीत केली जाणार आहे. पालकमंत्री जबाबदारी व जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी आपण स्विकारली आहे. जिल्ह्याच्या विकासासोबतच पक्ष मजबुतीसाठी कामेदेखील केले जाणार आहोत. मागील काळात जे झाले ते घडून गेले आता सत्तेत आहोत तेव्हा आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आता संघटन परत मजबूत करून जिल्ह्यातील महत्वाचे सत्तास्थाने काबिज करण्यासाठी सामुहिक प्रयत्न करणे गरजेचे आहेत. सत्ता आली की आयारामांची संख्या अचानक वाढत असते. त्यामुळे आयारामांपेक्षा नविन कार्यकर्ते निर्माण करून त्यांच्या जोरावर जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत केली जावी. आगामी बैठकीत जिल्ह्यातील पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेतली जाईल. त्यात शाखा अध्यक्षापासून सर्वाच्या कामाचा लेखा जोखा पाहिला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी केले. शहर जिल्हाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांनी प्रास्ताविक केले.

नुसते हार नको कागद घेवून या
मागील पाच वर्षाच्या काळात कार्यकर्त्यांची कामे अडवली गेली होती. आता आपली सत्ता आली आहे. या सत्तेचा पू्र्ण उपयोग करून घ्यावा. कार्यकर्त्यांनी नेत्यांचे स्वागत करण्यासाठी हार-तुरे न आणता आपल्या कामाचा कागद घेवून यावा त्यांची कामे प्राधान्याने केली जातील असे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी या वेळी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com