मोरांवर शिकाऱ्यांचे विघ्न

Peacock-Leaf
Peacock-Leaf

औरंगाबाद - उत्सवात सजावटीला मोठे महत्त्व. त्यामुळे सजावट साहित्याचा बाजार भरतो. अशी सजलेली बाजारपेठ काय घेऊ अन्‌ काय नको, अशी स्थिती करून टाकते. झगमगत्या या बाजारपेठेच्या गल्ल्या, रस्ते, चौकात मात्र किडूकमिडूक पण लक्षवेधी वस्तूंचा हलताझुलता बाजार भरतो. 

अशात बाजारात मोरपीस विक्रेत्यांची गर्दी दिसतेय. एवढी ताजी, टवटवीत मोरपिसे एकदम आली कुठून, असा चक्रावून टाकणारा प्रश्‍न पडतो. पिसांसाठी मोरांची कत्तल केली असावी, असा संशय पक्षीमित्र, वन्यप्रेमी व्यक्त करतात तेव्हा धक्का बसतो...

‘‘मोर थुई थुई नाचतो, 
त्याची पिसं सांडतात,  
लोक इतकी हुशार की 
ते त्याचाही बाजार मांडतात...’’ 
मोरांवर माणसाची वक्रदृष्टी असलेल्या कविता करून कवींनी सावधान केले; परंतु या राष्ट्रीय पक्ष्याला शिकाऱ्यांनी लक्ष्य करून त्याचे अस्तित्वच धोक्‍यात आणले आहे. सध्या शिकाऱ्यांनी मोरांच्या पिसांचाच बाजार मांडला आहे. एका मोरपिसाच्या जोडीसाठी ६० ते ७० रुपये आकारण्यात येत आहेत.

मोर नाचताना त्याची पिसं सांडतात; पण ती तुरळक स्वरूपात असतात. गळून पडलेली पिसे ही विस्कटलेली असतात. विक्रीस आलेली पिसे ही सरळ आणि ताजी असल्याने मोरांची कत्तल करून ती विक्रीस आणल्याचा संशय आहे. एकाचवेळी विक्रीस आणलेली इतकी मोठी मोरपिसे आली कुठून? असा प्रश्न निर्माण होत आहे. विक्रेत्यांना याबाबत विचारले असता, त्यांनी ही मोरपिसे परराज्यांतून आणल्याचे सांगितले; पण परराज्यांतील मोर हा ‘राष्ट्रीय पक्षी’ नाही का? यावर काही विक्रेत्यांनी तर चक्क भाष्य करण्याचेच टाळले. 

शहराच्या आजूबाजूला असलेल्या गौताळा, खुलताबाद, वेरूळ, अजिंठा, पितळखोरा भागांत मोठ्या प्रमाणात मोर आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, हर्सूल तलाव, सातारा-देवळाई परिसर, हिमायतबाग परिसरातही मोरांचा वावर आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून परिसरातील मोरांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. पिसे व मांसासाठी त्यांची कत्तल होत असावी, असा संशय पक्षीमित्रांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

मोरांची संख्या गेल्या दोन वर्षांपासून निश्‍चितच कमी झालेली आहे. मानवाचा हस्तक्षेपही जंगलात जास्त वाढल्यामुळे जायकवाडी अभयारण्य, गौताळा, सारोळा, पडेगाव वन भागातील मोरांची संख्या पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा खाली आली आहे. हे असेच चालू राहिले तर भविष्यात मोर नाममात्र राहतील. मोरपिसांबाबत वन विभागाने विक्रेत्यांकडे चौकशी करावी. 
- डॉ. दिलीप यार्दी (मानद वन्यजीव संरक्षक)

मोरांना जास्त उंच उडता येत नाही. चार ते पाचवेळा उडाल्यावर ते थकतात. त्यामुळे मोरांची शिकार करणे सोपे जाते. हिमायतबागेत ३५० मोर होते, आता फक्त ३० ते ३५ शिल्लक राहिलेत. जिल्ह्यातील जंगल भागातही हीच स्थिती आहे. पिसांची एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारी विक्री खरोखर संशय निर्माण करणारी असून वन विभागाने चौकशी करून ही पिसे कोठून येतात, याचा छडा लावावा.
- किशोर पाठक, पक्षीमित्र, औरंगाबाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com