कलंक परिस्थिती अन् प्रवृत्तींमुळे; पण आमची संवेदना आणि दानत काही औरच!

Peoples of Beed
Peoples of Beed

बीड : सर्वाधिक दुष्काळ आणि दुष्काळामुळे सर्वाधिक आत्महत्या, सर्वाधिक ऊसतोड मजूर असलेला जिल्हा, स्त्री भ्रूण हत्याही याच जिल्ह्यात सर्वाधिक आणि कुख्यात दहशतवादी अबू जिंदालही याच जिल्ह्यातील. एवढे कमी की काय निवृत्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांनी बीड जिल्हा कसा वाईट यावरच एक पुस्तक लिहले. 

कायम दुष्काळी जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधाही नाहीत. शेतकऱ्यांचे आयुष्य निसर्गाच्या भरवशावरच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कायम दुष्काळाचाच सामना करावा लागतो. २०१० पासून आढावा घेतला, तर काही वेळा ओला तर बहुतांशवेळा कोरडा दुष्काळ पडला. मागच्या वर्षीचे दुष्काळाचे दुष्टचक्र अद्यापही संपलेले नाही. मागच्या वर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या निम्माच पाऊस झाला. चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला. त्यामुळे हवालदिल शेतकरी मरण जवळ करत आहे. २०१४ पासून जिल्ह्यात एक हजारांवर शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. नापिकी व कर्जबाजारीपणाचे ओझे गळफास लावला, तरच डोक्यावरून हटेल, असाच शेतकऱ्यांना भरोसा वाटतो.

सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेला जिल्हा हा लागलेला कलंक ही सरकारी यंत्रणा आणि निसर्गाचा आशिर्वाद आहे. जिल्ह्याची दुसरी ओळख ही सर्वाधिक ऊसतोड मजूर पुरवणारा जिल्हा, पण सरकारने जिल्ह्यात रोजगारांची साधने उपलब्ध करुन दिली असती वा सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन दिली असती, तर दुसऱ्या राज्यात जाऊन ऊसतोडणीची गरज का, पडली असती हा साधा प्रश्न आहे. आणि चोरी चपाट्यांपेक्षा ऊसतोडणी ही मेहनतही याच मातीतल्या रक्तात आहे, ही दुसरी बाजू आहे. सर्वाधिक स्त्री-भ्रूण हत्याही याच जिल्ह्यात झाल्या. पण, यात सहभाग किती प्रवृत्तींचा याचाही विचार व्हायला हवा. काही प्रवृत्तींमुळे जिल्ह्याची बदनामी कशाला अशीही दुसरी बाजू आहे.

एवढे कमी की काय, म्हणून काही दहशतवादी कारवायांत आणि अबू जिंदालसारखी नावे या जिल्ह्याशीच जोडलेले. पण, अशा बोटांवर मोजण्याच्या प्रवृत्तींमुळे बीड जिल्ह्याला काही कलंक आणि विशेषणे लागली. या जिल्ह्याच्या प्रशासनात बड्या हुद्द्यांवर राहायचे आणि बदली होऊन गेल्यानंतर जिल्हा भ्रष्ट अशी बदनामी करायचाही. असेही पराक्रम काही अधिकाऱ्यांनी करुन जिल्ह्याला अधिकच डाग लावला आहे.

काही कलंक आणि विशेषणे जिल्ह्याच्या माथी लागले असले तरी ते परिस्थिती आणि काही प्रवृत्तींमुळे आहे. मात्र, संवेदना काय असते आणि दानत कशी असावी याचे ज्वलंत उदाहरण बीडकरांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या पूरग्रस्तांना मदतीच्या माध्यमातून दाखविले आहे. मागच्या वर्षीच्या दुष्काळातून जिल्ह्यातील शेतकरी आणि सामान्य माणूस अद्यापही सावरलेला नाही. यंदाही पावसाने डोळे ओटारलेलेच आहेत. पण, स्वत: अडचणीत असलेल्या बीडकरांनी सांगली व कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी मदतीचा महापtर सुरू केला आहे. शुक्रवारी जिल्ह्यातून पाच ट्रक आवश्यक सामान रवाना केले. शुद्ध पाणी, खाद्यपदार्थ, बिस्कीट आणि नगदी रक्कम घेऊन ही वाहने वरील दोन्ही जिल्ह्यात पोचून मदत वाटपही सुरु झाले. पण, मदत जमा करण्याचा ओघ शनिवारीही सुरु होता.

शनिवारीही जिल्ह्यातील अनेक गावांत आणि शाळांमध्ये मदत फेऱ्या निघाल्या. दुष्काळग्रस्त जिल्हावासियांनीही भरभरुन मदतीचे दान केले आणि शेकडो वाहने वस्तूंनी भरले आहेत. आमच्यावरील कलंक हे परिस्थिती आणि प्रवृत्तीचे असून दानत रक्तात आणि संवेदना हृदयात असल्याचेच बीडकरांनी यातून दाखविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com