"सकाळ'मुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद 

"सकाळ'मुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद 

जालना - मराठवाड्यातील दुष्काळ निवारणार्थ "सकाळ माध्यम समूहा'ने हाती घेतलेले जलसंधारणाचे कार्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविणारे आहे, असे मत राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले. 

गोंदेगाव (ता. जालना) येथे "सकाळ रिलीफ फंडा'तून हाती घेण्यात आलेल्या नदी खोलीकरणाच्या कामाचे सोमवारी (ता. 24) श्री. खोतकर यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी ते बोलत होते. 

श्री. खोतकर पुढे म्हणाले, की दुष्काळी परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनासोबतच अनेक खासगी व सेवाभावी संस्था पुढे येत आहेत. माध्यम म्हणून "सकाळ'ने कायम सकारात्मक भूमिका घेतली आहे. ऍग्रोवन, तनिष्का महिला मंडळ, सकाळ रिलीफ फंड या माध्यमातून "सकाळ'ने हाती घेतलेले विकास कार्य कौतुकास्पद आहे. शेतकरी हिताच्या अशा कामांना आपले कायम सहकार्य राहील, असेही ते म्हणाले. जिल्हा परिषद सदस्य बबन खरात, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, माजी पंचायत समिती सदस्य ब्रह्मा वाघ, सरपंच वाल्मीक वाघ, तहसीलदार बिपिन पाटील, नायब तहसीलदार संदीप ढाकणे, साहेबराव वाघ, जयाजी चौरे, बबन जाधव, सुभाष चौरे आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. अन्य उपस्थित मान्यवरांनी जलसंधारणाच्या कामाबाबत भूमिका मांडून "सकाळ'च्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. 

तहसीलदार श्री. पाटील, श्री. ढाकणे यांनी खोलीकरणाच्या कामाची पाहणी करून उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमास ग्रामसेविका के. पी. इंगळे, यू. बी. थंगाळे, कृषी सेविका एस. डी. सोनवणे, तलाठी श्रीमती एस. एस. ढवळे, रंजन खरात, अनिरुद्ध वाघ, बळिराम वाघ, शाहू खंदारे, फकिरा शेख, प्रकाश भालेकर, बद्री वाघ, भास्कर पवार, बबन जाधव, शिवाजी जाधव, कृष्णा जाधव, रामू वाघ, राजू वाघ, बबन वाघ यांच्यासह तनिष्का सदस्यांची उपस्थिती होती. 

आत्महत्या मन सुन्न करणाऱ्या 
वडीरामसगाव येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची नुकतीच भेट घेतली. जिल्ह्यात वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत. आज शेतकरी असो की व्यापारी प्रत्येकाच्या डोक्‍यावर कर्ज आहेच. व्यापाऱ्यांवर कोट्यवधींचे कर्ज असते; परंतु ते आत्महत्या करतात का? काही अडचणी असतील तर शेतकऱ्यांनी आपल्याशी चर्चा करावी. चर्चेतून अडचणींवर तोडगा निघतो; मात्र कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे भावनात्मक आवाहन या वेळी श्री. खोतकर यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com