...या भागातील शेतकऱ्यांची गुळ निर्मितीला पसंती

photo
photo

गिरगाव (जि. हिंगोली) ः वसमत तालुक्‍यातील गिरगाव परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी गुळ कारखान्याकडे (गुऱ्हाळ) वळले आहेत. साखरेपेक्षा गुळाला अधिक भाव मिळत असून काही गुळ कारखानदार दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रूपये क्विंटलप्रमाणे ऊस खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नगदी पैसे मिळत आहेत. सध्या गुळाला तीन हजार दोनशे रूपये क्‍विंटलचा भाव मिळत आहे.


 वसमत तालुक्‍यातील गिरगावसह परजना, खाजमापुरवाडी, पार्डी बुद्रुक, कानोसा वडगाव, रेडगाव, सालापूर, पार्डी खुर्द, दांडेगाव या भागातून इसापूर व येलदरी धरणाचे कालवे जातात. त्यामुळे या भागात सिंचनाचे क्षेत्र अधिक आहे. या भागातील शेतकरी नगदी पिके घेण्यावर भर देतात. ऊस, केळी, हळद व कापूस ही पिके मोठ्या प्रमाणावर या भागात घेतली जातात. गतवर्षी सिंचनासाठी मुबलक पाणी नसतानाही अनेक शेतकऱ्यांनी उसाचे पीक घेतले आहे. गिरगावात दोन हजार एकरवर उसाची लागवड झाली आहे. या भागातील सिंचनक्षेत्र लक्षात घेता परिसरात पूर्णा व टोकाई साखर कारखाना उभारण्यात आले आहेत. सध्या साखर कारखान्याचे गाळप सुरू झाले असले तरी अनेक साखर कारखान्यांना ऊसासाठी धावपळ करावी लागणार असल्याचे चित्र आहे. त्यातच साखरेच्या भावतही घसरण होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. साखरेपेक्षा गुळाला अधिक भाव मिळत असून सध्या तीन हजार दोनशे रुपये क्‍विंटलचा भाव मिळत आहे.

पंचवीस ते तीस मजुरांना मिळाला रोजगार


गुळ कारखानदार सक्रीय झाले असून गुळाचे कारखाने उभारण्यात आले आहेत. गिरगाव व टोकाई साखर कारखान्या जवळ ऊस गाळपासाठी गुऱ्हाळ तयार झाले असून येथे शेतकऱ्यांकडून दोन हजार रूपये क्‍विंटलप्रमाणे उसाची खरेदी केली जात आहे. सध्या ऊस तोडणीची कामे सुरू झाली आहेत. यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील ऊस तोडणी मंजूर कुटुंबीयांसह येथे दाखल झाले आहेत. ऊसतोड मजुरांमुळे गुळ कारखान्याला फायदा होत आहे. तसेच या कारखान्यावर पंचवीस ते तीस मजुरांना कामे लागल्याने रोजगार निर्माण झाला आहे. 

राज्यासह परराज्यात जातोय गुळ विक्रीला


या वर्षी टोकाई व पूर्णा साखर कारखाना उशिराने सुरू झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरला आहे. काही शेतकऱ्यांनी दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्‍विंटलप्रमाणे गुळ कारखान्याला ऊस विकला आहे. यामुळे शेतकऱ्यांना रोख रक्कम हातात पडत आहे. येथील कारखान्यावर तयार झालेला गुळ औरंगाबाद, कोल्‍हापूर, सातारा यासह गुजरात, आंध्रप्रदेश या राज्यात ठोकमध्ये ३२०० ते ३३०० रुपये क्‍विंटलप्रमाणे विकला जात आहे. 

पाकाचीही विक्री तेजीत


उसापासून गुळ तयार केला जात आहे. गुळाला चांगलीच मागणी वाढली आहे. यासोबतच पाक तयार करून त्याची विक्री करण्यास काही शेतकरी प्राधान्य देत आहेत. सध्या या भागात पाक चाळीस रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे.

बाजारात गुळ व पाक दोन्हीला चांगली मागणी


वसमत तालुक्‍यातील टोकाई व पूर्णा हे दोन साखर कारखाने यावर्षी उशिराने सुरू झाले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी गुळ कारखान्याकडे ऊस विक्री केला आहे. यातून शेतकऱ्याला नगदी पैसे मिळाले आहेत. बाजारात गुळ व पाक दोन्हीला चांगली मागणी असल्याने अनेकांनी गुळ तयार करून त्‍याची ठोकमध्ये विक्री सुरू केली आहे.
-तुकाराम जाधव, ऊस उत्‍पादक शेतकरी

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com