औरंगाबाद - टप्पा वाहतुकीची परवानगी केवळ एसटीलाच आहे. असे असताना राज्यभर खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून राजरोसपणे टप्पा वाहतूक करून परिवहन महामंडळाच्या बसला ब्रेक लावण्याचा गोरखधंदा सुरू आहे. बससेवेचा गळा घोटणाऱ्या एजंटांना नेमके कुणाचे अभय आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
सरकारकडून राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनेक योजना, धोरणांमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती पाहायला मिळते. शासनातर्फे शहरासह ग्रामीण भागात प्रवासी वाहतुकीची सेवा देण्याचे काम परिवहन महामंडळ करीत आहे. टप्पा वाहतुकीची परवानगी केवळ परिवहन महामंडळालाच आहे; मात्र मागील काही वर्षांपासून खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपन्यांना, काळी पिवळीसह अन्य वाहनधारकांना याप्रकरणी रोखण्याऐवजी सरकारी यंत्रणेनेच मोकळे रान सोडले आहे. यामुळे एसटीच्या प्रगतीला ब्रेक लावणाऱ्या दुकानदारांची खासगी बस मात्र सुसाट धावत आहे. यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. परिवहनच्या बसस्थानकांमध्ये पंखे, लाइट, सुरक्षा व्यवस्थेचे तीन-तेरा वाजत असून, खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांची स्थानके मात्र वातानुकूलित बनली आहेत. यामुळे निश्चितच खासगी प्रवासी वाहतुकीकडेच प्रवाशांचा ओढा वाढत आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असताना परिवहन महामंडळाचे अधिकारी मूग गिळून गप्प का? अधिकाऱ्यांकडून खासगी धोरणाला सर्रास मदत होत असल्याने महामंडळाचा डोलारा डळमळीत करणाऱ्यांना नेमके कुणाचे अभय आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून, खासगी वाहतुकीला प्रोत्साहन देणारे शासनाचे धोरण एसटीच्या मुळावर उठले आहे.
जेवणाचे नव्हे, लुटण्याचे थांबे
प्रवाशांना चहा, नाश्ता, जेवण करता यावे यासाठी प्रवासादरम्यान ठरवून दिलेल्या भोजनालयावर बस थांबविली जाते. या ठिकाणी वाहक- चालकांना मोफत जेवण दिल्याचे पाहायला मिळते; मात्र कुठल्याही प्रकारच्या चांगल्या सुविधा नसताना चहा, नाश्ता आणि जेवणाचे अवाच्या सव्वा बिल दाखवून पैसे उकळले जात आहेत. त्यामुळे जेवणाचे नव्हे, हे तर लुटण्याचे थांबे बनले आहेत, असा आरोप सातत्याने प्रवासी करीत आहेत.
|