शेतात जाताना पाण्यातून प्रवास... 

वालसावंगी (ता.भोकरदन) : पाण्यातून बैलजोडी काढताना शेतकऱ्याची सुरू असलेली धडपड.  
वालसावंगी (ता.भोकरदन) : पाण्यातून बैलजोडी काढताना शेतकऱ्याची सुरू असलेली धडपड.  

वालसावंगी (जि.जालना) -  परिसरात यंदा पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे नद्या, नाले खळखळत वाहत आहे, परिणामी नदीनाल्यांच्या पल्याड असणाऱ्या शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांचा पाण्यातून प्रवास सुरू झालेला आहे. कोणी बैलगाडीतून, कोणी तराफा बनवून तर कोणी पाण्यात पोहून जात आहे. पावसाळ्यातील ही कसरत आता पाणी ओसरेपर्यंत चालणार आहे. 

मेळ भागात पुलाची प्रतीक्षा 
मेळ भागात नदीपलीकडे जाण्यासाठी पुलाची व्यवस्था नसल्याने नदीपलीकडे शेत असणाऱ्या शेतकऱ्यांना, महिलांना, मजुरांना शेतात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. सध्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असल्याने शेतात जाणे कठीण झाले आहे. पर्याय म्हणून शेतकऱ्यांना होडी, तराफाचा सहारा घेऊन जीव मुठीत धरून नदीपात्र ओलांडून ये-जा करावी लागते आहे. हा रस्ता विदर्भाला जोडतो, शिवाय येथील अनेक शेतकऱ्यांची शेती नदीच्या दुसऱ्या बाजूस आहे, त्यामुळे या ठिकाणी पूल तयार करावा ही जुनी मागणी आहे, त्याच अनुषंगाने या ठिकाणी पूलदेखील मंजूर झाला होता; मात्र पावसाळ्यापूर्वी वेळेवर काम झाले नाही. परिणामी पुन्हा तराफा, होडीचा सहारा घेत ग्रामस्थ नदी ओलांडत आहेत. यंदा तर मोठ्या प्रमाणावर परिसरात पाऊस कोसळत असल्याने जास्त दिवस नदीला पाणी राहणार आहे, त्यामुळे यंदा शेतकी माल वाहताना चांगलीच कसरत शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. यंदा तरी पुलाचे काम लवकर करावे अशी मागणी शेतकरी करीत आहे. 

बैलजोडी शेतात न्यावी कशी? 
सध्या मेळ परिसरात नदी वाहत आहे, होडीचा सहारा घेऊन शेतकरी, मजूर जाऊ शकतात. मात्र शेतकी मालाची वाहतूक करताना बैलजोडी शेतात न्यावी कशी असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. काही शेतकरी तर कमी खोलीच्या पाण्यातून बैलजोडी शेतात नेत आहे, अर्थात मोठी कसरत करूनच. 

पद्मा नदीवर पूल उभारण्याची गरज 
वालसावंगी ते वडोद तांगडा जोडणाऱ्या रस्त्यावरील पद्मा नदीवर सुद्धा पूल उभारण्याची गरज आहे, या ठिकाणी सुद्धा नदीप्रवाहातून मार्ग काढत ये-जा करावी लागते आहे, अनेक वाहने या ठिकाणाहून काढताना वाहनधारक त्रस्त होत आहे, शिवाय नदीपात्र भरल्यास नदीपल्याड जाणेदेखील कठीण होत आहे. 

मेळ भागात नदी पल्याड माझे शेत आहे, नदीला पाणी असल्याने नदीतून मार्ग काढत शेतात जाणे कठीण आहे, त्यामुळे तराफा, होडीचा आधार घ्यावा लागत आहे. पुलाअभावी शेती करणे कठीण झाले आहे, त्यामुळे पुलाची उभारणी गरजेची आहे. 
-दिलीप लाठे 
शेतकरी 
............ 
शेतात जाण्यासाठी पूल नसल्याने मजूरदेखील कामासाठी यायला नकार देत आहे, यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत, शिवाय शेतातील शेतमाल, शेतकी साहित्य वाहतूक करणेदेखील जिकिरीचे झाले आहे. 
- नीलेश आगे 
युवा शेतकरी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com