बीडचा मूल्यवर्धनाचा पथदर्शी प्रकल्प राज्यात राबविणार 

devendra-fadanvis
devendra-fadanvis

बीड - 2009 मध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाची सुरवात सर्वप्रथम बीड जिल्ह्यातील 500 शासकीय शाळांमध्ये झाली. 35 हजार विद्यार्थ्यांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाचा लाभ घेतला. शिक्षणातील लोकशाही मूल्यांशी संबंधित अध्ययन निष्पत्ती लक्षणीय प्रमाणात साध्य झाल्याचे येथील मूल्यमापन अभ्यासामध्ये दिसून आले. आता बीडचा मूल्यवर्धनाचा पथदर्शी प्रकल्प राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

शालेय शिक्षण विभाग आणि पुण्याच्या शांतीलाल मुथ्था फाउंडेशनतर्फे बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमासंदर्भातील आढावा बैठक मंगळवारी (ता. आठ) मंत्रालयात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासह शालेय शिक्षणचे प्रधान सचिव नंदकुमार, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, शिक्षण आयुक्त धीरजकुमार, एमसीईआरटीचे संचालक गोविंद नांदेडे, शांतीलाल मुथ्था फाउंडेशनचे शांतीलाल मुथ्था आदी उपस्थित होते. 

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये रचनावादी दृष्टिकोन विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी पालक आणि शिक्षक यांचा समावेश असणे आवश्‍यक आहे. तसेच मूल्यवर्धित महाराष्ट्र घडविण्यासाठी मूल्याधिष्ठित दर्जेदार शिक्षण ही काळाची गरज आहे. या मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. 

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, आजघडीला 20 कोटींपेक्षा अधिक शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ज्ञान, कौशल्य आणि क्षमता वाढविण्याची गरज आहे. मूल्यवर्धन कार्यक्रम राबविताना शिक्षकांचे मूल्यसंवर्धन आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता संवर्धनावर विशेष भर देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही नागरिकत्व रुजविण्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

एमसीईआरटीमार्फत हा उपक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर या उपक्रमाचे मूल्यमापन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणासाठी हा उपक्रम शांतीलाल मुथ्था फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत आहे. त्या उपक्रमाला राज्य शासनाने सहकार्य केले आहे. मूल्यवर्धित महाराष्ट्र घडविण्यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण ही काळाची गरज आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल. असे करीत असताना सेवानिवृत्त शिक्षकांची या उपक्रमात मदत घेतली जाऊ शकेल का? ही बाब तपासून घेण्याचे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या राज्यातील अंमलबजावणीची माहिती या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. मूल्यवर्धन कार्यक्रम अधिक बळकट करण्यासाठी या संस्थेमार्फत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती तावडे यांनी यावेळी दिल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी कळविले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com