पती, बहिणीचा बळी गेला, आता मुलांचे जीव घेणार का? 

पती, बहिणीचा बळी गेला, आता मुलांचे जीव घेणार का? 

औरंगाबाद - बीड बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने दोन वर्षांपूर्वी पती गमावला, बहिणीचा बळीही याच रस्त्याने घेतला. आता मुलांचे जीव घेणार का? असा सवाल पाणावलेल्या डोळ्यांनी एका महिलेने पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, आमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले यांना सोमवारी (ता. 11) केला. सर्व्हिस रोड महापालिकेमुळे रखडला असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, आठ दिवसांत रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर प्रशासनाची अंत्ययात्रा काढू, अशा इशारा या वेळी नागरिकांनी दिला.

बीड बायपास मृत्यूचा सापळा बनला असून, आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत. गेल्या 48 तासांत दोन महिलांचे मृत्यू झाल्यानंतरही प्रशासन, पदाधिकारी दखल घेत नसल्याने संतप्त नागरिकांनी रविवारी (ता. 10) रात्री सातारा पोलिस ठाणे गाठून बीड बायपास सर्व्हिस रोडच्या दिरंगाईला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करीत तक्रार दाखल केली. त्यानंतर सुमारे दोनशे ते अडीचशे नागरिक सोमवारी सकाळी जबिंदा लॉन्स येथे जमा झाले. त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सर्व्हिस रोडचे काम आजच्या आज सुरू करण्यात यावे, अशी मागणी या वेळी सर्वानुमते करण्यात आली. स्मिता पठारे या सातारा परिसरात राहणाऱ्या महिलेने आपबिती सांगितली. दोन वर्षांपूर्वी अपघातामध्ये पतीचा मृत्यू झाला. बहीणही याच रस्त्यावर अपघातामध्ये गेली. आता मुलांचे बळी घेणार का? असा प्रश्‍न करताना त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. त्यावर सारेच काही काळ स्तब्ध झाले व तातडीने काम सुरू करण्यात येईल, असे आश्‍वासन या वेळी नागरिकांना देण्यात आले. यावेळी नगरसेविका सायली जमादार, स्मिता घोगरे, सिद्धांत सिरसाट तसेच सविता कुलकर्णी, प्रदीप बुरांडे, प्रवीण जाधव, प्रा. रमेश अवसरमल, रमेश बहुले, सोमिनाथ शिराणे, रणजित ढेपे, अल्ताफ बागवान, अभिजित देशमुख, अजिंक्‍य गायकवाड, राजेंद्र राठोड, रेखा सोनवणे, मीना भोसले, मंगला दळे, मधू गोरे, शोभा यादव, गोदावरी गायकवाड यांच्यासह महिला नागरिकांनी सहभाग घेतला होता. 
 
...अन्यथा प्रशासनाची अंत्ययात्रा काढणार 
ज्या अधिकाऱ्यांमुळे सर्व्हिस रोडचे काम रखडले त्यांच्यासह महापालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर प्रशासनाची अंत्ययात्रा काढण्यात येईल. लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील या वेळी देण्यात आला. 

महापौरांचे कोणी ऐकत नाही... 
महापौर नंदकुमार घोडेले यांनी वारंवार आम्हाला आश्‍वासन दिले; मात्र त्यांचे अधिकारी ऐकतच नाहीत. त्यांना कशाला बोलाविले, असा प्रश्‍न नागरिकांनी केला. काहींनी शिवसेनेने काहीच केले नाही, असाही आरोप केला. त्यावर सविता कुलकर्णी यांनी इथे पक्षाचा संबंध नाही. एक रहिवासी म्हणून आपण आमदार, महापौरांना बोलाविले आहे. राजकारण नको, असे आवाहन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com