सोयाबीन काढणीतच रब्बीच्या पेरणीची लगबग

उमरगा : बहरलेल्या तुरीवर पाने, फुले कुरतडणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने औषधी फवारणी करताना शेतकरी.
उमरगा : बहरलेल्या तुरीवर पाने, फुले कुरतडणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने औषधी फवारणी करताना शेतकरी.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच कामाला जुंपले आहे; तण वाढलेल्या रानाची मशागत करून पेरणीची तयारी, भिजलेल्या सोयाबीनची रास करण्याची लगबग आणि तुरीवर पडलेल्या अळ्यांचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी औषधी फवारणीचे काम, ही सर्व कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.


खरीप हंगामातील पिकांच्या उत्पन्नात अवेळी झालेल्या पावसामुळे फारशी वाढ होऊ शकली नव्हती. जेमतेम निघालेल्या उडीद, मुगाची हमीभावाची प्रतीक्षा करण्यापेक्षा अडत बाजारात विक्री करावी लागली. दरम्यान, तूर पिकावर झालेल्या अळ्या, किडींचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांना महागडी औषधी फवारणी करावी लागत आहे. चोहोबाजूंनी एकदाच कामाचे ओझे पडल्याने शेतकऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. 

दुहेरी कामांचे ओझे 
ऐन पेरणीच्या तोंडावर परतीच्या पावसाने सुरवात केल्याने शेतातील वाढलेले तण काढण्यासाठी शेतकऱ्यांना पुरेसा अवधी मिळाला नाही. त्यात सोयाबीन काढणीच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना बुचकाळ्यात टाकले. कसेतरी राशी आटोपून घेण्याची लगबग सुरू असताना पुन्हा पावसाची धार सुरू झाली होती. पावसाने खंड दिल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून सोयाबीनच्या गंजी खुल्या करून उन्हाचा मारा देऊन राशी केल्या जात आहेत, आणखी काही ठिकाणी राशी करण्याचे काम सुरूच आहे. दुसरीकडे रब्बीच्या पेरणीला विलंब झाल्याने पेरणीचे कामे आटोपून घेण्याची कसरत करावी लागत आहे. 
कसं शक्य आहे वाचा - पपईने बनवले लखपती
तूर पिकावर औषधी फवारणी 
खरीप हंगामातील तूर पेरणीचे क्षेत्र कमी होत आहे. शेतकऱ्यांचा भर सोयाबीनवर वाढला आहे. साधारणतः पंधरा हजार हेक्‍टर क्षेत्रावर तूर पीक आहे. परतीचा पाऊस अधिक झाल्याने काही क्षेत्रात तूर पिकाला धोका निर्माण झाला आहे. आता ढगाळ वातावरणामुळे फुलस्थितीत असलेल्या तुरीवर अळ्यांचा मारा होत आहे. शिवाय फळधारणेच्या स्थितीतही अळ्यांचा मारा होत आहे. अळ्या, किटकांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढल्याने काही ठिकाणी औषधी फवारणीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली असून महागड्या औषधींची खरेदी आणि फवारणीसाठी लागणाऱ्या मजुरीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक जुळवाजुळव करावी लागत आहे. 

हरभरा पेरणीला प्राधान्य 
परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरणीसाठी रानात वापसा येण्यास विलंब झाल्याने पेरण्याही उशिरा सुरू झाल्या. शेतातील तण काढण्यासाठी तणनाशकाची फवारणी करावी लागत आहे. हरभरा, ज्वारी, गहू, करडईची पेरणी सध्या सुरू आहे. आगोटी पेरणीची संधी मिळू शकली नसल्याने यंदा ज्वारीच्या पेरणीचे क्षेत्र अधिक दिसणार नाही. शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीला सर्वाधिक पसंती दिली आहे. गव्हाचे पेर क्षेत्रही यावेळी वाढणार आहे. 

यंदाच्या खरीप हंगामातील पिकाचे उत्पन्न घटले, परतीच्या पावसाने रब्बीच्या पेरणीला विलंब झाला आहे. तूर पिकावर आता अळ्यांचे विघ्न सुरू झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ होत आहे. शिवारातील पिकाची जोपासना करण्याचा प्रयत्न केला जातोय; मात्र ऐनवेळी नैसर्गिक दुष्टचक्रात पिकांचे नुकसान होते आणि शेतकऱ्यांची आर्थिक, शारीरिक मेहनत वाया जाते. 
- बबन इंगळे, शेतकरी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com