औरंगाबाद - 'देशाच्या पहिल्या पंतप्रधानांपासून आतापर्यंतच्या पंतप्रधानांपर्यंत सर्वांकडूनच शेतकरीविरोधी धोरणे अवलंबली गेली. या सर्व शासनकर्त्यांच्या कारस्थानाचे बळी शेतकरी ठरत आहेत,'' अशी टीका शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी (ता. 20) पत्रकार परिषदेत केली.
शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा शहरात दाखल झाली. त्याअनुषंगाने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, 'सरकारने दुधाच्या दरात जाहीर केलेला हमीदर मिळाला नाही. सरकारकडून संपूर्ण कर्जमाफी देताना हात का आखडता घेतला जातोय. चार लाख शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या. याला आताचे सत्ताधारी व विरोधक दोघांचीही धोरणे कारणीभूत आहेत. घटनेतील तरतुदीनुसार हमीदरासंदर्भात ट्रायब्युनल नेमायची व्यवस्था आहे. मग आजवरच्या व आताच्या सरकारांनी तसे का केले नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. काही लोकांना शासनात घेतले म्हणजे ते ज्या घटकांसाठी लढले त्यांचे प्रश्न सुटले का? मुळात हे शासनकर्ते शेतकऱ्यांचा आवाज दडपण्यासाठीची ही नीती अवलंबत आहेत,'' असा आरोपही त्यांनी केला.
24 मे रोजी जेलभरो आंदोलन
सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले म्हणाले, 'ही यात्रा गावखेड्यांत जाऊन शासनकर्त्यांच्या शेतकरी, कष्टकरी व कामगारांविरोधातील धोरणांविषयी जागर करण्याचे काम करीत आहे. 27 एप्रिलला या यात्रेचा समारोप होणार आहे. 14 मे रोजी मागण्यांच्या पूर्ततेसाठी जेलभरो आंदोलन केले जाईल. त्याची तयारी सुरू आहे.''
|