लातूर - 'मलाही राजकीयदृष्ट्या सेटल व्हायचे आहे. ताकाला जाऊन मोरवं आम्ही लपवीत नाही. आमची उमेदवारी घेऊन निवडणूक लढवा, असे अनेक राजकीय पक्ष माझ्यामागे लागले आहेत; पण तुमचा पक्ष बाजूला ठेवा, असे त्यांना ठणकावून सांगितले आहे. गरज पडली तर राजकीय पक्षही काढू; पण सध्या शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे,'' असे शेतकरी संघटनेचे नेते व अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी सांगितले
'शेतकऱ्यांच्या जिवावर मोठी झालेले खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल ही पोटं भरायला गेलेली माणसे आहेत. त्यांच्याविषयी बोलूच नका,'' अशी तिखट टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीतर्फे काढण्यात आलेली शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रा आज येथे आली. आतापर्यंत चार लाख शेतकऱ्यांचा बळी घेण्याचे काम वेगवेगळ्या सरकारांनी केले आहे. जगभर माल जाऊ दिला जात नाही आणि येथे भाव दिला जात नाही. त्यामुळे बळिराजा आत्महत्या करीत असल्याचे ते म्हणाले.
|