कष्ट पायदळी...

वालसावंगी (ता. भोकरदन) : शेतात कापणी करून ठेवलेल्या ज्वारीच्या पिकांवरील कणिसांना कोंब फुटले आहेत. या पिकांतून मार्गक्रमण करताना हतबल शेतकरी. 
वालसावंगी (ता. भोकरदन) : शेतात कापणी करून ठेवलेल्या ज्वारीच्या पिकांवरील कणिसांना कोंब फुटले आहेत. या पिकांतून मार्गक्रमण करताना हतबल शेतकरी. 

वालसावंगी (जि. जालना) -  मागच्या वर्षी चातकासारखी वाट बघूनसुद्धा पाऊस आला नाही. यंदा मात्र पाऊस उघडावा अशी प्रार्थना करूनसुद्धा तो बरसत राहिला. परिणामी खरीप पिकांचा हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावला. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाच्या खाईत जाऊन पडला आहे. पावसाने घात केल्याने यंदा शेतातील कष्ट पायदळी तुडविले गेले आहेत. बियाणांचे अंकुर डोळ्यांना सुखावणारे असतात, मात्र अकाली बहरलेली कणसातली पिके डोळ्यांच्या कडा ओलावून टाकत आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून वालसावंगी (ता. भोकरदन) परिसरात जोरदार पावसाची हजेरी नित्याची झाली आहे. त्यात शुक्रवारी (ता. एक) संपूर्ण रात्रभर मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला. नंतर पुन्हा शनिवारीदेखील (ता.दोन) दिवसभर पाऊस सुरूच होता. त्यामुळे पावसाच्या या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर पडण्याचे मार्गच राहिलेले नाहीत. ऐन सोंगणीच्या वेळी पाऊस पडल्याने मका, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय कपाशी, तूर, मिरची पिकालादेखील पावसाचा मोठा फटका बसत आहे. अनेक शेतात मका, सोयाबीन, ज्वारी पिकाला कोंब आले आहेत. 

विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. कोणत्याही पद्धतीने मका, सोयाबीन पिके वाचावी म्हणून उत्पादक शेतकऱ्यांनी शक्‍य ते प्रयत्न केले; मात्र पुन्हा पावसाला सुरवात झाली. यामुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या मनात धाकधूक वाढली आहे. शुक्रवारी रात्री पडलेल्या पावसाने तर शेतात पुरता धुमाकूळ घातला आहे. आता खरीप पिके पूर्णपणे हातची गेल्याने शेतकरी पुरता खचून गेला आहे. सलग दुसऱ्या वर्षीदेखील खरीप पिके हातची गेल्याने आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली आहे. यापुढेही होणार आहे. वालसावंगीसह परिसरात सुंदरवाडी, वाढोणा, जयदेववाडी, विझोरा, धावडा, पद्मावती या गावांतील शेतशिवारातही विदारक चित्र बघायला मिळत आहे. 

गेल्या वर्षीच्या कोरड्या दुष्काळाच्या कटू आठवणी बाजूला सारत यंदा पैशाची तजवीज करीत खरीप पेरणी केली होती; मात्र सततच्या पावसामुळे आशेवर पाणी सारले आहे. खरीप मालाला बाजारात भाव मिळणेही कठीण झाले आहे. शासनाने आता सर्व बाबींचा विचार करून योग्य नुकसानभरपाई देण्याची गरज आहे. 
- राजू गारोडी, शेतकरी  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com