जालना - शहरात शुक्रवारी (ता.तीन) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. हा पाऊस अर्ध्या शहरात झाला. मागील दोन-तीन दिवसांपासून शहरात पावसाने उघडीप दिली होती. त्यानंतर शुक्रवारी (ता.तीन) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धातास पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे अंबड चौफुली, मोतीबाग, जिल्हाधिकारी कार्यालय, नूतन वसाहत आदी ठिकाणीच पाऊस झाला.
घनसावंगी शहराबरोबर तालुक्यात ठिकठिकाणी शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. या पावसाने खरिपांच्या पिकांना चांगला फायदा होणार असल्याचे चित्र आहे. घनसावंगी तालुक्यात यंदा पावसाळ्यात सुरवातीपासून चांगल्या प्रमाणात पावसाने जोर धरला आहे. या पावसामुळे खरिपांच्या मूग, कापूस, सोयाबीन, तूर या पिकांना चांगला फायदा होत आहे. पिकांच्या उगवणक्षमतेनुसार जोरदार पाऊस होत असल्याने हा पाऊस पिकास पोषक ठरत आहे. शुक्रवारी (ता.तीन) सायंकाळी सहा वाजेपासून रात्री उशिरापर्यंत पावसाने चांगलाच जोर धरला. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
हेही वाचा : जुईत पाऊस थुईथुई...
जांबसमर्थ परिसरात शुक्रवारी सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शेतात कामे करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांची धांदल उडाली. मिश्र केलेली खते पेरणी न करता तशीच दुसऱ्या पिकांना टाकून दिली. पुन्हा दिवसभर सर्वांना प्रचंड उकाडा सहन करावा लागला. सायंकाळी सहा वाजता पुन्हा आभाळ भरून आले व रात्री सात वाजेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली.
हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार
वालसावंगी परिसरात शुक्रवारी दुपारी दहा मिनिटे रिमझिम पावसाची हजेरी लागली. या भागात खरीप पेरणी केल्यानंतर एकदाही जोरदार पाऊस पडला नाही. काही दिवसांपूर्वी केवळ भिजपाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. पिकांना देखील पावसाची गरज आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.