उस्मानाबाद : दोन हजार कुटुंबांना मिळाला हक्काचा निवारा 

00 ramai.jpg
00 ramai.jpg

उस्मानाबाद : जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतीच्या क्षेत्रातील तब्बल दोन हजार कुटुंबियांना हक्काचा निवारा उपलबध झाला आहे. असे असले तरी अद्याप एक हजार ८७ घरकुलांचे बांधकाम अद्याप सुरूच झालेले नाहीत. विशेष म्हणजे निधी असतानाही पालिका क्षेत्रात बांधकाम सुरू करण्यात तांत्रिक अडचणींचा अडसर येत असल्याचे दिसून येत आहे.

अनुसूचित जातीमधील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबियांना राहण्यासाठी पक्के घर असावे, यासाठी रमाई आवास योजनेच्या माध्यमातून घराच्या बांधकामासाठी आर्थिक मदत केली जाते. जिल्ह्यात या भागासाठी गेल्या चार वर्षात पाच हजार ७७० घरकुलांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. यातील तीन हजार ४६५ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी एक हजार २५९ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर ८६९ घरकुलांचे काम अंतिम टप्प्यात आहे. पिढ्यान-पिढ्या ज्यांच्या डोक्यावर पक्के घर नव्हते. अशा दोन हजार १२८ गरीब कुटुंबियांनाही यातून हक्काचा निवारा मिळाला आहे. यामध्ये उस्मानाबाद शहरात ५१५ कुटुंबियांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर तुळजापूर १४९, नळदूर्ग ७१, उमरगा ११५, कळंब ७८, भूम ६८, परंडा ८४, मुरुम १४८, वाशी २१ तर लोहाऱ्यात एकही बांधकाम पूर्ण झालेले नाही.

प्रगतीपथावरील बांधकामे

उस्मानाबाद शहरात ५८०, तुळजापूर ५४, नळदूर्ग ३२, उमरगा सात, कळंब ४४, भूम २६, परंडा ५८, मुरुम १९, वाशीत ५९ तर लोहाऱ्यात एकही बांधकाम प्रगतीपथावर नाही. लोहरा शहरात २०१८-१९ मध्ये १२५, २०१९-२० मध्ये ३० असे एकूण १५५ घरकुलांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. यापैकी केवळ ६१ घरकुलांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र अद्याप एकही घरकुलाचे बांधकाम सुरू झालेले नाही. त्यामुळे या नगरपंचायतीच्या कामकाजावर आश्चर्य व्यक्त होत आहे.

१०८७ बांधकामे सुरूच नाहीत 

जिल्ह्यात अद्यापही १० कोटी ४३ लाख ९० हजार रुपयांचा निधी शिल्लक आहे. असे असतानाही तब्बल एक हजार ८७ बांधकामे अद्याप सुरूच झालेली नाही. यामध्ये काही जणांनी बांधकामाचा पहिला हप्ता घेतला मात्र अद्याप बांधकाम सुरू केले नाही, अशांची संख्या मोठी आहे. अशा नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

उस्मानाबाद शहरात रमाई आवास घरकुलांची स्थिती चांगली आहे. मात्र काही नागरिक हप्ता घेऊन पैसे इतरत्र वापरतात. अशांवर कारवाई केली जाणार आहे. अन्यथा त्यांनी बांधकाम सुरु करावे. दरम्यान काही नागरिकांकडे तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळेही त्यांचे बांधकाम सुरू होत नाही. - हरिकल्याण येलगट्टे, मुख्याधिकारी, उस्मानाबाद पालिका.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com