लातूर : जम्मू काश्मीर आणि लडाखमधील 370 कलम हटवून मोदी सरकारने चूक केली, असे मी म्हणणार नाही. चांगल्या गोष्टींचे स्वागतच केले पाहिजे, अशा शब्दांत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले. ते करतानाच चाकूरकर यांनी हे कलम काढल्याने होणाऱ्या परिणामांकडेही आता सरकारने लक्ष देऊन, त्या अडचणी सोडवायला हव्यात, असेही सुचवले.
विवेक विचार मंचाच्या वतीने कलम 370 आणि जम्मू काश्मिर, लडाखचे भवितव्य या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यात शिवराज पाटील-चाकूरकर आणि विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. अशोक कुकडे यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. या वेळी मंचाचे सुधाकर जोशी, मिलिंद बिलोलीकर उपस्थित होते.
हेही वाचा - पवार कुटुंबात कोण काय करतंय?
नेहरूंचा एकट्याचा निर्णय नव्हता
चाकूरकर म्हणाले, कलम 370 वरून काहीजण पंडित जवाहरलाल नेहरू यांना दोष देतात, असे का? हा निर्णय काही एकट्या पंडितजींनी घेतला नव्हता. त्यावेळी त्यांच्यासोबत वल्लभ भाईसुद्धा होते. सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला होता, एकता आणि शांतता प्रस्थापित राहण्यासाठी. ते एक कॉंप्रमाईज होते. त्यावेळी घेतलेल्या या निर्णयाला चुकीचे आहे, असे म्हणता येणार नाही आणि तिथे विशिष्ट धर्माचे लोक राहतात म्हणून हे कलम काढले गेले, असेही म्हणणे चुकीचे आहे.
या निर्णयामुळे अन्य ठिकाणी असलेले जुने कलम कधी काढणार, असे विचारले जात आहे. असे वेगवेगळे प्रश्न सोडवले गेले पाहिजे.
सध्या काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत आहे, असे सांगून डॉ. कुकडे यांनी देशात एकात्मता वाढीस लागणे आणि ती स्थिर होणे गरजेचे आहे, यावर भर दिला.
मी माझ्या जातीसाठी, मतदार संघासाठी काय केले हे राजकारण्यांनी सांगू नये. मी माझ्या राज्यासाठी, देशासाठी, मानवाच्या कल्याणासाठी काय केले, हे सांगायला हवे.
- शिवराज पाटील-चाकूरकर, माजी केंद्रीय गृहमंत्री
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.