औरंगाबाद - एसटी महामंडळाच्या शिवशाही बसवर रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे विपरीत परिणाम झाला आहे. खड्ड्यांमुळे शिवशाहीच्या देखभालीचा खर्च तर वाढलाच; मात्र अनेक फेऱ्या रद्द करण्याची भूमिका महामंडळाला घ्यावी लागत आहे.
खासगी प्रवासी वाहतुकीला तोंड देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने गेल्या वर्षीपासून राज्यात शिवशाही बस सुरू केल्यात. वातानुकूलित आणि माफक दरातील प्रवास शिवशाही घडवत असल्याने मोठ्या प्रमाणावर खासगी वाहतुकीचे प्रवासी महामंडळाकडे वळले आहेत.
शिवशाही लोकप्रिय होत असतानाच राज्यातील खराब रस्त्यांचे ग्रहण शिवशाही बसगाड्यांना लागले आहे. राज्यातील बहुतांश रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे शिवशाहीच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढला आहे. अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर बसचा मार्ग बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा निर्णय एसटीच्या अधिकाऱ्यांना घ्यावा लागत आहे. औरंगाबाद-लातूर मार्गावर औरंगाबाद आगाराच्या तीन आणि लातूर आगाराच्या चार अशा सात शिवशाही बस रोज सोडल्या जातात; मात्र शनिवारी (ता. एक) लातूर आगाराने औरंगाबादला बस पाठवलीच नाही. या मार्गावर बीडजवळील मांजरसुंबा ते लातूरदरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्याने शिवशाही रद्द करावी लागल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचप्रमाणे अकोला-औरंगाबाद या शिवशाहीच्याही फेऱ्या रद्द कराव्या लागत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढला
राज्याच्या बहुतांश रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले असल्याने शिवशाही बसच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढला आहे. याशिवाय डिझेलचाही वापर वाढला असल्याने महामंडळाला अनेक मार्गावरील शिवशाही बस चालवताना विचार करावा लागत आहे. अनेक मार्ग बंद करून दुसऱ्या मार्गावर बस वळवाव्या लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
|