लातूर - विषमता व जाती वर्णांची उतरंड नष्ट करून समाजातील समानतेसाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, असे मत ज्येष्ठ कामगारनेते बाबा आढाव यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या येथील स्काऊट ऍण्ड गाईड कार्यालयात शनिवारी (ता. सात) आयोजित 38 व्या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. बशारत अहमद, स्वागताध्यक्ष प्रा. एस. व्ही. जाधव, ऍड. वसंतराव फाळके, उत्तमराव पाटील, प्रा. जी. ए. उगले, डॉ. अशोक चोपडे, प्रा. नूतन माळवी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मुर्गाप्पा खूमसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. आढाव म्हणाले, "आजही समाज व्यवस्थेत जाती वर्णांची उतरंड अडखत-रखडत टिकून आहे. देशातील सद्यःस्थिती त्यासाठी जबाबदार आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे व डॉ. कलबुर्गींसारखे विद्वान संपविले जातात. तरीही चळवळी उभ्या आहेत. जातीच्या आधारे आरक्षणासाठी व अन्य मागण्यांसाठी मोर्चे - प्रतिमोर्चे निघत आहेत. काही प्रवृत्ती हे सर्व घडवत आहेत; मात्र आज जातीअंताची नितांत गरज आहे, महात्मा फुलेंनी 1873 मध्ये जातीव्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यांची ही लढाई अजून चालूच आहे.'
या वेळी प्रा. पी. जी. भिसे, डॉ. सी. एस. माळी, प्राचार्य शिवाजी माडे, प्रा. श्रीराम गुंदेकर, प्रा. अशोक तांबे, श्रीरंग जाधव, धर्मराज सिरसाट, संजय क्षीरसागर, मदन यादव, अरविंद कांबळे, प्रा. व्यंकट पाटील, प्रा. व्ही. आर. दाडगे, प्रा. दत्ता सोमवंशी, प्रा. फ. म. शहाजिंदे, प्रा. गुलाम वाढवणे, ऍड. व्ही. जी. शंके, महेश गुंड, अखिलेश आईलाने, किरण पवार, तेजस माळी, भीम गडेराव, विक्रांत शंके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. या अधिवेशनाचा समारोप शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. आठ) सायंकाळी सहा वाजता होणार आहे.
|