जायकवाडी - गेल्या एक महिन्यापासून शालेय पोषण आहारासाठी शाळांना तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठाच होत नाही. त्यामुळे तालुक्यातील २४४ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ६ प्रशालांना व अनुदानित ५० अशा एकूण ३०० शाळांत खिचडी शिजविणाऱ्या चुली गेल्या एक महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना शाळेत रोज खिचडी मिळत नाही.
या आठवड्यात जर शाळांना मालपुरवठा होऊन सुरळीत खिचडी सुरू करण्याची कार्यवाही करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली नाही तर शिक्षक सेना आक्रमक पावले उचलणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
शाळांमध्ये खिचडी शिजत नसल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या घटत जाणाऱ्या उपस्थितीवर झाल्याचे लक्षणीयरीत्या दिसून येत आहे.
त्यामुळे तत्काळ शाळांना शालेय पोषण आहारासाठी मालपुरवठा करण्याची मागणी शिक्षक सेनेचे तालुकाप्रमुख अमोल एरंडे, तालुका सरचिटणीस कैलास मिसाळ, कार्याध्यक्ष अमोलराज शेळके, कोषाध्यक्ष लक्ष्मण गलांडे, प्रसिद्धिप्रमुख पांडुरंग गोर्डे, कार्यालयीन सचिव श्रीकांत गमे, किशोर तोतरे आदींनी केली आहे.
जिल्हास्तरावरून तांदळाचा पुरवठा बंद आहे. त्यामुळे शाळेत खिचडी बंद असून तांदळाचा पुरवठा झाल्यास शाळांना दिला जाईल; परंतु केव्हा होतो ते सध्या सांगता येणार नाही.
- ए. पी. खान, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, पैठण
जवळपास एक महिन्यापासून तालुक्यातील सर्वच शाळांचा शालेय पोषण आहार बंद आहे. एखादा दिवस जर मुख्याध्यापक यांच्याकडून अपरिहार्य कारणास्तव पोषण आहार बंद राहिला, तर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. आता मात्र प्रशासनाकडूनच तांदूळ पुरवठ्याअभावी पोषण आहार बंद आहे. यासाठी जबाबदार यंत्रणेवर कारवाई झाली पाहिजे.
- अमोल एरंडे, तालुकाप्रमुख, शिक्षक सेना
आमच्या शाळेत एक महिन्यापासून भात शिजत नाही. त्यामुळे आम्हाला घरून डबे घेऊन यावे लागतात. शाळेत सुटीत पोषण आहाराऐवजी घरचे डबे खातो.
- महेश सरोदे, विद्यार्थी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केसापुरी, ता. पैठण.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.