जालना झेडपीच्या शाळेत तिची कुचंबणा 

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

जालना -  शंभराहून अधिक जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलींसाठी स्‍वच्‍छतागृह नसल्याने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची मोठी कुचंबणा होत आहे. मुलींबरोबर तब्बल १६० शाळेत मुलासांठीही स्‍वतंत्र स्‍वच्‍छतागृह नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बेटी बचाव , बेटी पढावचा नारा देणारे शासन आणि प्रशासन मुलींच्या अस्मितेबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल किती गाफील आहे, याचा प्रत्यय समोर आला आहे. 

जिल्हा परिषदेच्या जिल्हाभरात दीड हजार शाळा आहेत. त्यांपैकी हजारो शाळा वर्षभरापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्याकडे दुर्लक्ष असताना जवळपास अडीचशेहून अधिक शाळात मुली-मुलींसाठी स्‍वच्‍छतागृह नसल्याचे बाब समोर आली आहे. स्‍वच्‍छतागृह नसल्याने मुलींना घरी जाऊन परतावे लागते तर अनेकदा आडोसा शोधत नैसर्गिक विधी करावा लागतो.

दरम्यान मुलींचा जन्मदर आणि शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी बेटी बचाव-बेटी पढाव मोहिमेवर लाखो रुपयाचा खर्च करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासन मुलींसाठी स्‍वच्‍छतागृह बांधू शकत नाही का? असा संतप्त सवाल पालकवर्गातून विचारल्या जात आहे. शिक्षण विभागातर्फे स्‍वच्‍छतागृह देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १११ शाळामध्ये मुलींसाठी तर १६० शाळेत मुलांचे स्‍वच्‍छतागृह नाही. मात्र, जिल्हा परिषदेच्या सभापती पुजा सपाटे यांनी हा आकडा यापेक्षाही अधिक असल्याचे सांगितले आहे. 

शालेय व्यवस्‍थापन समित्या नावालाच 

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेत मुला-मुलींसाठी स्‍वतंत्र स्‍वच्‍छतागृह असणे बंधनकारक आहे. अनेक शाळात ते बांधण्यात आले आहे. परंतु, त्याची नियमित स्‍वच्‍छता करण्यात येत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणच्या शाळेतील स्‍वच्‍छतागृह वाईट अवस्‍थेत आहे. शालेय व्यवस्‍थापन समित्यांचेही याकडे लक्ष नसल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. 

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्‍वच्‍छतागृह नसलेल्या शाळांत रोजगार हमी योजनेतून ते उभारण्यासाठी मान्यता दिली आहे. लवकरच जिल्हास्‍तरीय समितीची मान्यता घेऊन ही कामे करण्यात येणार आहे. 
कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी 

जिल्हाभरात स्‍वच्‍छतागृह नसलेल्या शाळांची संख्या शंभरपेक्षाही अधिक आहे.ही वस्तुस्थिती असून गंभीर बाब आहे. आरोग्य मंत्र्याच्या बैठकीत यावर चर्चा झाली असून रोजगार हमी योजनेतून तातडीने स्‍वच्‍छतागृह बांधण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने याबाबत प्रस्‍ताव सादर करावे. 
पुजा सपाटे, 
सभापती, जिल्हा परिषद 

विविध योजनांच्या माध्यमातून शाळेत मुलींसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करून दिले जातात मात्र, त्याच्या वापराबाबत अनेक ठिकाणी स्थानिकांचे सहकार्य नसल्यामुळे मुख्याध्यापकांना पाणी, स्वच्छतेसाठी मनुष्यबळ व निधीची कमतरता पडते. त्यामुळे शाळेचे स्वच्छतागृह वापरण्यायोग्य राहात नाही. विद्यार्थिनीची मोठी कुचंबणा होते. 
सुजाता भालेराव, 
केंद्रप्रमुख सिंधी काळेगाव 

स्‍वच्‍छतागृह ही मूलभूत गरज आहे. ते नसल्यास विद्यार्थ्यांच्या शरीराबरोबरच मानसिकेतेवरही परिणाम होतो. दडपण येणे, वर्गात लक्ष न लागणे असे परिणाम होऊ शकतात. 
डॉ.आनंद अग्रवाल, मानसोपचार तज्ज्ञ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com