परभणी : ऊसतोड कामगारांच्या पाल्यांची अबाळ होऊ नये, म्हणून दरवर्षी समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात अनिवासी हंगामी वसतिगृह सुरू करण्यात येतात. यंदाही ४६ वसतिगृहांना सुरवात झाली असून यात दोन हजार ४८८ विद्यार्थी प्रस्तावित आहेत. दरम्यान, वसतिगृहांना प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करत लाभार्थी संख्येची सत्यता पडताळणी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केंद्रप्रमुखांना दिले आहेत. त्यांच्या भेटीच्या अहवाला नंतरच वसतिगृहातील प्रत्यक्षातील विद्यार्थी संख्या समोर येइल.
दरवर्षी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात जिल्ह्यातून मोठ्यासंख्येने मजूर ऊस तोडणीसाठी जातात. तसेच कामाच्या शोधात दिवाळीनंतर बांधकाम, वीटभट्टीसह विविध कामांसाठी अनेक मजूर स्थलांतर करतात. अशा स्थलांतरामुळे त्यांच्या पाल्यांची शैक्षणिक हेळसांड होऊ नये व शिक्षणाच्या प्रवाहात ते टिकून राहावेत म्हणून समग्र शिक्षा अभियानांतर्गत हंगामी वसतिगृहाची योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत शाळा व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून स्थलांतरित मजुरांच्या पाल्यांसाठी वसतिगृह सुरू केले जातात. सहा महिन्यांसाठी ही योजना राबविली जाते. सहा महिन्यांसाठी एका विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून आठ हजार ५०० रुपये अनुदान मिळते. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यासाठी परभणी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने मजूर स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत यंदा ता. १४ नोव्हेंबर २०१९ पासून हंगामी वसतिगृह सुरू केले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना एक वेळा अल्पोहार आणि सायंकाळी पूर्ण भोजन दिले जाते. तसेच मासिक आरोग्य तपासणी करण्यात येते. संबंधित मुख्याध्यापक यांच्याकडे वसतिगृहाची जबाबदारी असून केंद्रप्रमुखांनी महिन्यातून किमान दोन वेळा भेट देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
वसतिगृह असणारी गावे
लांडकवाडी, सोनेरी तांडा, सिरसम, रामापूर तांडा (पालम), मुळी, धनगर मोहा, बोथी, बोर्डा, गोदावरी तांडा, बोथी तांडा, दामपुरी, ढवळकेवाडी, हनुमाननगर, इसाद, निळा नाईक तांडा, देवला नाईक तांडा, राणीसावरगाव, चिखली तांडा, सुप्पा तांडा, धारासूर तांडा, घटांग्रा (गंगाखेड), सूरपिंपरी, मांडाखळी, ब्रम्हपुरी, ब्रम्हपुरी तांडा (परभणी), केकरजवळा (मानवत), पाथरगव्हाण बु, बोरगव्हाण, गुंज, केदारवस्ती, रामनगगर, बाबुलतार, मसलातांडा, नेहरूनगर, कानसूर वस्ती, वडी, जवळा झुटा, उमरा, बानेगाव, मंजरथ, टाकळगव्हाण तांडा, वाघाळा, रामपुरी खु. (पाथरी) आदी.
चुकीची माहिती देणाऱ्यांवर कार्यवाही
जिल्ह्यात जी हंगामी वसतीगृह सुरु झाली आहेत. त्यामध्ये उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांची वस्तुनिष्ठ माहिती ता.२५ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्विराज बी. पी. यांनी केंद्रप्रमुखांना दिले आहेत. विशेष म्हणजे तपासणी करण्यासाठी तालुकाबाह्य केंद्रप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. सादर केलेल्या अहवालात चुकीची लाभार्थी संख्या अढळून आल्यास संबंधीतावर कार्यवाही होणार आहे. गतवर्षी दोन हजार ४२७ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाली होता. यंदाही दोन हजार ४८८ विद्यार्थी संख्या प्रस्तावीत असून प्रत्यक्ष विद्यार्थी संख्या तपासणीचे काम सुरु झाले आहेत. त्यानंतर अधिकृत विद्यार्थी संख्या पुढे येणार आहे.
तपासणीचे काम सुरु
स्थलांतरीत मजुरांचा एकही पाल्य शिक्षणापासून वंचीत राहणार नाही. याची काळजी समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून घेतली जात आहे. सिईओ पृथ्विराज बी. पी. यांच्या मार्गदर्शनाखाली योजना राबवली जात आहे. त्यांच्या सुचनेनुसार वसतीगृह तपासणीचे काम सुरु झाले आहे, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचेता पाटेकर-रोडगे यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.