उस्मानाबाद : जिल्हा परिषद पुन्हा आमदार राणा जगजितसिंह पाटील गटाकडे गेल्याचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होते आहे. अधिकृत घोषणा बाकी असली तरी अध्यक्षपदी अस्मिता कांबळे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे धनंजय सावंत यांची निवड निश्चित मानली जात आहे. तसे स्पष्ट संकेतही भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी दिले आहेत.
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या उस्मानाबाद जिल्हा परिषदेवर अखेर आमदार राणाजगजितसिंह पाटील गटाने वर्चस्व राखले आहे. गेली तीन वर्षे जिल्हा परिषद आमदार पाटील यांच्या ताब्यात आहे. पुन्हा एकदा जिल्हा परिषदेला स्वतःच्या गटाकडे ठेवण्यात आमदार पाटील यांना यश आल्याने जिल्ह्यात अजूनही राणा पाटलांचे वर्चस्व असल्याचे त्यांनी या माध्यमातून दाखवून दिले आहे.
तीन वर्षापूर्वी अशी होती स्थिती
तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक म्हणजेच 26 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस13, शिवसेनेचे 11, भाजपचे 4 तर एक अपक्ष असे बलाबल होते. आमदार कैलास पाटील हे विधानसभेवर निवडून गेले आणि शिवसेनेचे संख्याबळ 1ने कमी झाली आहे. तर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्याने यांच्यासोबत 17 सदस्य होते. शिवाय भाजपचे चार सदस्यही आमदार पाटील यांच्यासोबत होते. महाआघाडीकडे 24 तर आमदार पाटील गटाकडे 23 असे बलाबल होते. त्यामुळे यातून कोण बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. अखेर प्राध्यापक तानाजी सावंत यांनी निर्णायक भूमिका घेत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अध्यक्षपदी पाटील गटाच्या अस्मिता कांबळे यांची निवड निश्चित मानली जात आहे. तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे धनंजय सावंत होणार असल्याचे संकेत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.