औरंगाबाद - एसटी महामंडळाच्या बसचे आयुर्मान वाढविण्यात येणार आहे. सध्या आठ वर्षांत रद्दबातल ठरवली जाणारी बस दहा ते बारा वर्षांपर्यंत चालवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी दिली.
एसटी महामंडळात आमूलाग्र बदल करण्यात येत आहेत. सध्या महामंडळाच्या बसची चॅसी आठ वर्षांमध्ये तोडून बस निकामी केली जाते; मात्र वाढता खर्च आणि बसचा तुडवडा लक्षात घेऊन आठऐवजी बस दहा वर्षांपर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुळात वाहनाचे आयुर्मान हे पंधरा वर्षांपर्यंत असते, त्यामुळे चॅसीचे वय वाढवल्याने कुठलाही परिणाम होणार नाही. उलट वाहनाच्या मूळ वयापेक्षा पाच वर्षे लवकर बस निकामी केली जाणार असल्याचे देओल यांनी स्पष्ट केले. यापुढे आठ वर्षे झालेल्या बसची पुनर्बांधणी करून त्या बसला पुन्हा दहा ते बारा वर्षांपर्यंत चालविण्यात येणार आहे.
शिवशाही चालकांना प्रशिक्षण
शिवशाही बस पहिल्यांदाच रस्त्यावर आल्या आहेत. बस नवीन असतानाच, गेल्या काही दिवसांत बसच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रत्यक्षात बसच्या अपघातांची विविध कारणे आहेत. अनेक अपघात हे अन्य वाहनांमुळे झाले आहेत. असे असले तरीही चालकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या खासगी तत्त्वावरील आणि महामंडळाच्या अशा दोन्ही बसचालकांना प्रत्येक विभाग नियंत्रक कार्यालयामार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे. एका अपघातात बस उलटली होती. त्यामुळे बसच्या तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यात आला; मात्र बस तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सक्षम आहे, असे देओल म्हणाले.
|