एसटी महामंडळ करणार मालवाहतूक

file photo
file photo

कळमनुरी( जि. हिंगोली) : कोरोनो आजारामुळे अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाने आपले नुकसान भरून काढण्यासाठी रोजगाराच्या माध्यमातून मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती कळमनुरीचे आगार प्रमुख अभिजीत बोरीकर यांनी दिली. 

कोरोना आजारामुळे तीन महिन्यानंतर काही ठराविक भागात बस सेवा सुरू केल्यानंतर एका बसमधून केवळ २१ प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. 

नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न

इंधन, चालक, वाहक व गाडीची दुरुस्ती पाहता उत्पन्न कमी अन् खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत एसटी महामंडळाने महामंडळाच्या बस गाड्यांच्या माध्यमातून मालवाहतूक करण्याचा निर्णय घेत नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न चालविला आहे. 

दर पत्रक निश्चित केल्यामुळे फायदा

त्याकरिता मागील तीन महिन्यांपासून आगारात उभ्या असलेल्या बस गाड्या आता प्रवासी वाहतुकी बरोबरच मालवाहतूक करणार आहेत. त्याकरिता कळमनुरी आगाराच्या काही गाड्याचे रूपांतर मालवाहतूक गाडीमध्ये करण्यात आले आहे. एसटी महामंडळाकडून मालवाहतूक करताना व्यापारी व नागरिकांना खासगी मालवाहतूक वाहनाच्या तुलनेत दर पत्रक निश्चित केल्यामुळे फायदा मिळणार आहे. 

मालाच्या शंभर रुपयांवर २५ पैसे अधिभार

महामंडळाच्या गाडीमधून नऊ टन माल नेता येणार आहे. त्याकरिता ३५ रुपये प्रतिकिलोमीटर जाण्यासाठी त्याच व्यापाऱ्याने परतीसाठी हे वाहन वापरले तर २८ रुपये प्रति किमी दर ठरविण्यात आला आहे. तसेच मालाच्या शंभर रुपयांवर २५ पैसे अधिभार व मालाची चढ उतार संबंधित व्यापाऱ्याला करावी लागणार आहे. 

चार तासात माल उतरवणे बंधनकारक 

कमीत कमी तीन हजार रुपयापर्यंत भाडे घेतले जाणार असून हे भाडे नियोजित स्थळी पोचल्यानंतर चार तासात माल उतरवणे बंधनकारक आहे. त्यानंतर प्रति तास दोनशे रुपये खर्च उचलावा लागणार आहे. यामध्ये रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत कुठलेही अतिरिक्त भाडे आकारले जाणार नाही. महामंडळाच्या मालवाहतूक करणाऱ्या गाडीला लागणारा टोल टॅक्स महामंडळाकडून भरण्यात येणार आहे.

सवलत देण्याचे अधिकार विभाग नियंत्रकांना

 महामंडळाकडून मालवाहतूक सुरू केल्यानंतर नियमित व मोठ्या प्रमाणावर व्यवसाय प्राप्त झाल्यास संबंधित व्यापाऱ्यांना सवलत देण्याचे अधिकार विभाग नियंत्रक यांना देण्यात आले आहेत. याशिवाय भाड्यासाठी किलोमीटरची मोजणी माल भरलेल्या गावामधील बसस्थानक ते माल उतरण्याच्या गावातील बसस्थानकापर्यंत मोजले जाणार आहे. संबंधित व्यापारी अथवा नागरिकांचा माल बसस्थानक परिसराच्या ३० किलोमीटर अंतरापर्यंत पोचविला जाणार आहे. 

आगाराकडे वाहन उपलब्ध

शहर व परिसरातील व्यापारी व नागरिकांनी मालवाहतूक करण्यासाठी कळमनुरी आगाराकडे संपर्क करावा. मालवाहतूक करण्यासाठी आगाराकडे वाहन उपलब्ध झाले आहे. 
-अभिजीत बोरीकर, आगारप्रमुख, कळमनुरी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com