मराठवाड्यात एसटीच्या संपाने वाहतुक ठप्प

bus-stand.
bus-stand.

राज्यातील काही डेपोंमधील एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. वेतनवाढीच्या मुख्य मागणीसह अन्य इतर मागण्यांसाठी हा बंद पुकारला गेला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वेतनवाढ नाकारल्याने हे कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. काही कामगार संघटनांनी पुढाकार घेऊन या बंदची हाक दिली आहे. पण, प्रवाशांना कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने त्यांचा खोळंबा झाला आहे. मराठवाड्यातही याचे पडसाद उमटत आहेत. 

एसटी संपाचा बस सेवेवर अत्यल्प परिणाम
औरंगाबाद - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे औरंगाबाद विभागात 20 ते 25 टक्के बस सेवेवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील गंगापूर वैजापूर आणि पैठण येथील काही कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला, त्यामुळे काही गाड्या रद्द कराव्या लागल्या असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी यांनी दिली. औरंगाबाद बस स्थानकावर सकाळी काही काळ कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम दिसत होता, त्यामुळे काही गाड्या खोळंबल्या होत्या त्यानंतर मात्र बससेवा सुरळीत सुरू झाली आहे.

परभणीतही एसटीचा संप
परभणी - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपचा परिणाम परभणी शहरात सकाळ पासून दिसून आला. सकाळी काही कमी पल्याच्या गाड्या सुटल्या नंतर ९ वाजल्या पासून एकही बस आगारा बाहेर सोडण्यात आली नाही. जिल्ह्यातली सर्वच तालुक्यात तील बस बंद आहेत.

एसटी कर्मचारी संघटनेने शुक्रवार पासून संप पुकारला आहे. संपामुळे प्रवाश्यांनी खाजगी वाहतुकीचा सहारा घ्यावा लागला.

लातुरात बससेवा ठप्प
लातूर - एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले असल्याने लातुरातील एसटी बससेवा शुक्रवारी पहाटेपासून ठप्प झाली आहे; पण या आंदोलनामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे.

वेतनवाढी बाबत नाराजी व्यक्त करत महाराष्ट्र राज्य एस.टी. कामगार संघटना (संलग्न आयटक), महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) या संघटनांतर्फे मध्यरात्री बारापासून संपाला सुरवात झाली आहे. यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे चालक, वाहक, मेकॅनिक उत्सफूर्तपणे सहभागी झाले आहेत. त्यामुळे विविध मार्गांवर धावणाऱ्या लातुरातील 90 टक्क्यांहून अधिक बस डेपोमध्ये उभ्या आहेत; पण प्रवासी बस स्थानकावर बसची वाट पाहत ताटकळत उभे आहेत. 

महामंडळाचे लातूर विभागप्रमुख सचिन क्षीरसागर म्हणाले, कुठलीही पूर्वकल्पना न देता हा संप सुरू आहे. त्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांना बस सेवा सुरू करण्यास सांगत आहोत. त्यासाठी पालक अधिकारी नेमले आहेत. ते जिल्ह्यातील प्रत्येक बस स्थानकांना भेटी देत आहेत. याचा नक्कीच सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास आहे."

हिंगोलीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे पडसाद
मंगेश शेवाळकर
हिंगोली - एसटी कर्मचाऱ्यांना दिलेल्या तुटपुंजा पगार वाढीच्या निषेधार्थ विविध त्याला कर्मचारी संघटनेने अचानक संप पुकारल्याने हिंगोली जिल्ह्यातील वाहतूक ठप्प झाली आहे.

राज्याच्या परिवहन विभागाने एसटी कर्मचाऱ्यांसाठी केलेली पगारवाढीची घोषणा फसवी असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. कृती समितीच्या मागणीनुसार वेतन वाढ झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाने मात्र सर्व कर्मचाऱ्यांना 32 ते 48 टक्के वेतनवाढ होणार असल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्यक्षात 17 ते 25 टक्केच वाढ मिळत आहे. त्यामुळे शासनाची वेतनवाढीची घोषणा फसवी असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ विविध संघटनांनी गुरुवारी तारीख 7 मध्यरात्री बारा पासून संप पुकारला आहे. त्यामुळे आज सकाळी हिंगोली आगारातून लांब पल्ल्याच्या बसेस रवाना झाल्या नाहीत. एसटी कर्मचारी सकाळ पासूनच कार्यालयात बसून होते. या संपामुळे प्रवाशांची मात्र मोठे हाल झाले आहेत. सकाळीच बाहेरगावी जाण्यासाठी आलेले प्रवासी एसटीच्या वाट पाहत  बसले होते. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्याची माहिती झाल्यानंतर अनेक प्रवाशांनी खासगी प्रवासी वाहतुकीचा आसरा घेतला. याबाबत आगा प्रमुख डी बी झरीकर यांनी हिंगोली आगारातून सकाळी केवळ एक बस रवाना झाल्याचे सांगितले. एसटी कर्मचाऱ्यां सोबत चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संपामुळे आगारातील सुमारे 57 पेक्षा अधिक बसेस जागेवरच उभ्या होत्या.

जालन्यात बससेवा सुरळीत बंदचा अल्प परिणाम
उमेश वाघमारे
जालना - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या काही संघटनानी पुकारलेल्या शुक्रवारी (ता.आठ) बंदचा जालन्यात काही प्रमाणात परिणाम जानवला आहे. बहुतांश बस गाड्या शुक्रवारी (ता.आठ) नियमित सुरु होत्या. केवळ अंबड, परतुर, जाफराबाद या ठिकानच्या काही गाड्या बस स्थानकात थांबुन आहेत. मात्र जालना जिल्ह्यात सुमारे 90 टक्के बसेस नियमित सुरु आहेत.

बीड जिल्ह्यात तीन आगारांत सकाळी सुरळीत 
बीड - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे एसटीची चाके रुतली आहेत. चार आगारांतील बससेवा विस्कळीत असून तीन आगारांत सकाळच्या सत्रात सुरळीत सेवा सुरु आहे. त्यामुळे संप सर्वव्यापी नसल्याचे समोर आले.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्ह्यात एकूण साडेपाचशे बस आणि तीन हजार कर्मचारी आहेत. शुक्रवार (ता. आठ) मध्यरात्रीपासून कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली. मात्र, संपाबाबत कर्मचाऱ्यांनी अद्याप अधिकृत नोटीस दिली नसल्याची माहिती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जी. एम. जगतकर यांनी दिली. सकाळच्या सत्रात गेवराई, परळी, धारुर व माजलगाव या आगारातून प्रत्येकी एकेकच बस धावली. तर, बीड, अंबाजोगाई आणि आष्टी आगारातील सेवा सुरळीत असल्याचा दावा श्री. जगतकर यांनी केला. एकूण संपात फुट पडल्याचे चित्र आहे. संपात एकूण किती कर्मचारी सहभागी झाले हे सायंकाळी स्पष्ट होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com