तेरवीला फाटा देत शाळेत पाण्याची सोय 

लिंबेवडगाव (मंठा) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खरात कुटुंबीयांतर्फे करण्यात आलेली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. 
लिंबेवडगाव (मंठा) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खरात कुटुंबीयांतर्फे करण्यात आलेली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. 

जालना - जगण्याचे भान देणारी आई जग सोडून गेली. तिची आठवण कायम स्मरणात राहावी, तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, ही भावना जपत 19 वर्षीय स्वप्नील सोपान खरात या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने तेरवीच्या कार्यक्रमावर होणाऱ्या खर्चाला फाटा देत शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेतला. 

लिंबेवडगाव (ता.मंठा) गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत यानिमित्त रविवारी (ता. आठ) झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख नागनाथ गोरे होते. यावेळी राज्य बालरक्षक जगदीश कुडे, उपप्राचार्य अशोक खरात, सोपान खरात, स्वप्नील खरात, संतोष लिंगायत, प्रा. प्रदीप देशमुख, शालेय समिती अध्यक्ष दिगंबर शेरे, उपाध्यक्ष शिवाजी खरात, मुख्याध्यापक दत्तात्रेय राऊतवाड, सरपंच सोपान खरात, ओमप्रकाश खरात, रामप्रसाद मोरे, सुभाष खरात, नंदकुमार खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. 

लिंबेवडगाव गावातील शेतकरी सोपान खरात यांच्या पत्नी महानंदा यांची 28 नोव्हेंबर रोजी आजाराशी झुंज देतानाच प्राणज्योत मालवली. रविवारी (ता.8) तेरवीचा कार्यक्रम होता. तत्पूर्वी दोन दिवसांपूर्वी खरात यांचा 19 वर्षीय महाविद्यालयीन शिक्षण घेणारा मुलगा स्वप्नील याने आपण तेरवीचा कार्यक्रम न करता आईची आठवण कायम राहील असे काहीतरी करूया, असे सांगितले. स्वप्नीलने हा विचार काका मंठा येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य अशोक खरात यांना बोलून दाखविला. मुलाने घेतलेला निर्णय सर्वांनी मान्य केला. तेरवीच्या कार्यक्रमासाठी येणारा 21 हजार रुपये खर्च गावातील जिल्हा परिषद शाळेसाठी देण्याचा निर्णय झाला. खरात परिवाराने शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय राऊतवाड यांना विचार सांगितला. शाळेतील मुलांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्याचे ठरले. शाळेत पाण्याची टाकी व इतर सुविधा करण्यात आल्या. 

कार्यक्रमात शालेय विद्यार्थिनी सरस्वती श्रावणे, मनीषा खरात, पूजा विभुते, वैष्णवी खरात यांनी मनोगत व्यक्त करीत खरात परिवाराने शाळेला दिलेल्या सुविधांबदल कृतज्ञता व्यक्त केली, हे विशेष. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्तात्रेय राऊतवाड यांनी केले. कार्यक्रमासाठी डी. ए. चव्हाण, आर. एल. दासवाड, ए. ए. बुधवंत, एन. के. राठोड, ए. व्ही. राठोड यांनी प्रयत्न केले. 

आपण समाजासाठी काही केले पाहिजे, असे आई नेहमी सांगायची. आईची कायम आठवण आता शाळेत दिलेल्या या भेटीने लक्षात राहील. परंपरा आपण बदलायला पाहिजे, विचारच माणसाचे आयुष्य बदलवून टाकतो. 
- स्वप्नील खरात 

काळ बदलला तसे आपण बदलले पाहिजे. तेरवीच्या कार्यक्रमाला लोक येतात; पण जेवत नाहीत, हे मनाला पटत नाही. म्हणून या विचाराला फाटा देत तेरवीचा कार्यक्रम न करता शाळेला दिलेली मदत महत्त्वाची वाटते. 
प्रा. अशोक खरात 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com