बीड - भय्यू महाराजप्रणीत सूर्योदय परिवाराने जिल्ह्यात दुष्काळमुक्तीसह आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठे काम उभे केले आहे. राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मंडळींची त्यांच्याकडे नित्याने ये-जा असायची. सूर्योदय परिवाराच्या वतीने मागील दुष्काळात जिल्ह्यात मोठे काम करण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व इतर मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत "मानवतेचा महायज्ञ'च्या माध्यमातून विद्यार्थी, शेतकऱ्यांना मोठी मदत करण्यात आली. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना बैलजोडीसह गृहोपयोगी उद्योगांसाठी यंत्रांची मदत देण्यात आली. विद्यार्थ्यांना सायकलींसह शैक्षणिक साहित्य वाटप केले होते. दुष्काळमुक्तीसाठी मोफत शेततळे, नदी व ओढ्यांचे खोलीकरण, रुंदीकरणाची कामे करण्यात आली. दुष्काळात जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हौद, पशुपक्ष्यांच्या पाण्यासाठी कटोऱ्या, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, अशी दिलासादायक कामे करण्यात आली. गरजू रुग्णांना मोफत उपचारही मिळाले. गेल्याच महिन्यात त्यांनी जिल्ह्यातील 153 गावांमध्ये ग्राम कृषी सुधार अभियानाची सुरवात केली होती. या अभियानाची जनजागृतीही सुरू होती. त्यासाठी त्यांनी गेल्या महिन्यात दोन दिवसांचा जिल्हा दौरा केला होता. सामुदायिक विवाह सोहळ्यांसाठी त्यांचा नेहमी पुढाकार असायचा. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील मुलींच्या लग्नासाठी त्यांनी त्यांच्या सूर्योदय परिवारातर्फे मदत केली.
|