पवित्र पोर्टलमुळे भावी शिक्षकांची तारांबळ

पवित्र पोर्टलमुळे भावी शिक्षकांची तारांबळ

औरंगाबाद -  मागील काही दिवसांपासून तांत्रिक कारणांमुळे बंद पडलेले शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल सुरू झाले असून, इच्छुक उमेदवारांना परीक्षा क्रमांकानुसार २५ ते ३० जूनपर्यंत जाहिराती लॉक करण्याची सुविधा देण्यात आली आहे; मात्र सेल्फ सर्टिफाईड, वेबसाईट हॅंग, लॉगिन होत नसल्याने भावी शिक्षकांनी बुधवारी (ता.२६) उपसंचालक कार्यालयासमोर गर्दी केली होती; परंतु उपसंचालक गैरहजर असल्यामुळे दाद कुणाकडे मागावी असा प्रश्‍न उमेदवारांना पडला होता. त्यानंतर सर्व उमेदवारांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनाकडे धाव घेतली.

मागील सहा महिन्यांपासून शिक्षक भरतीबाबत गोंधळ सुरू आहे. भरतीसाठीचे पवित्र पोर्टल तांत्रिक कारणामुळे सातत्याने बंद पडत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार त्रस्त झाले आहेत. इच्छुक उमेदवारांना परीक्षा क्रमांकानुसार २५ ते ३० जूनपर्यंत जाहिराती लॉक करण्याची सुविधा उपलब्ध केल्याने पुन्हा पोर्टल सुरू करण्यात आले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शिक्षण संस्थांमधील १२ हजारांवर जागा भरण्यात येणार आहेत. शिक्षक भरतीमध्ये सध्या पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांच्या पात्रता व विषयांनुसार प्राधान्यक्रम यादी येत आहे; मात्र ही यादी अंतिम करता येत नाही. प्राधान्यक्रम भरण्यासाठी अगोदर २२ ते ३१ मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती; मात्र तांत्रिक अडचणीमुळे जाहिराती दिसत नव्हत्या आणि उमेदवारांना प्राधान्यक्रम भरतानासुद्धा अडचणी येत होत्या. जाहिरात दिसल्यावर प्राधान्यक्रम भरता येतो; मात्र पोर्टलवर माहिती भरण्यासाठी लॉगिनच होत नाही, पोर्टल सुरू झाल्यानंतर पासवर्ड मिसमॅच अशा अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. या अडचणींमुळे उमेदवारांना भरतीपासून वंचित राहाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी लॉगिनवर मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी उपस्थित भावी शिक्षक करत होते; मात्र प्राधान्यक्रम न भरता आल्यास उमेदवारांसाठी २५ ते ३० जून या कालावधीत सुविधा सुरू राहणार आहे, त्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही. उमेदवारांनी भरलेल्या माहितीमध्ये चुका झाल्याने हा एरर येत असल्याचे शासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ३० जूनपर्यंत पोर्टलवर उपलब्ध जाहिरातींचा अभ्यास करूनच योग्य निर्णय घ्यावा लागणार आहे. 

मुदतीत आणि नियमात ज्यांनी अर्ज केले आहेत; परंतु तांत्रिक अडचणी आणि सिस्टीममधील काही अडचण असेल तर ती सुधारण्यासाठी गुरुवारी (ता.२७) सकाळी ११ वाजता देवगिरी महाविद्यालयात बोलवण्यात आले आहे. त्यादेखील शासनाच्या नियमानुसार अंतिम झालेल्यांसाठी असेल; मात्र पुन्हा नव्याने काही अर्ज किंवा दुरुस्ती असे काही करता येणार नाही.
- डॉ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com