कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी!

कोराळ (ता. उमरगा) : परतीचा पाऊस आणि रोगाच्या प्रादुर्भावमुळे वाया गेलेले कांद्याचे पीक.
कोराळ (ता. उमरगा) : परतीचा पाऊस आणि रोगाच्या प्रादुर्भावमुळे वाया गेलेले कांद्याचे पीक.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : गेल्या सात-आठ वर्षांपासून उमरगा, लोहारा तालुक्‍यांत कांद्याचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. यंदा पाच हजार एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांद्याचे उत्पन्न घेतले आहे. पाण्याचे प्रमाण कमी असले, तरी पाण्याची जमवाजमव करून कांद्याची चांगली वाढ होऊ शकली; मात्र पातीची वाढ सुरू झाल्यानंतर रोगांचा विळखा, त्यात परतीच्या पावसाची भर पडल्याने जमिनीवर कांदा नासत आहे. उपलब्ध पाण्यावर चांगले उत्पन्न घेतलेल्यांना काही प्रमाणात दराची हमी असली तरी त्याचे क्षेत्र कमी आहे.

सध्या बाजारपेठेत कांद्याचे दर वाढले आहेत; मात्र शिवारातील कांद्याची स्थिती नाजूक झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 
अलीकडच्या सात-आठ वर्षांत कांदा उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. कोराळ, दावलमलिकवाडी, कदेर, तुगाव, सुंदरवाडी, महालिंगरायवाडी, दाळिंब, सालेगाव, करवंजी, हराळी, धानुरी, माकणी, उमरगा आदी भागांत पाच हजार एकराहून अधिक क्षेत्रावर कांद्याचे उत्पन्न घेतले जात आहे. एकट्या सालेगाव शिवारात दोन हजार एकर क्षेत्रात कांद्याची लागवण करण्यात आली आहे. साधारणतः सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यांत ही लागवण करण्यात येते; मात्र ऐन काढणीच्या दरम्यान दरात घसरण होत असल्याने मेहनतीवर पाणी पडते. 


शेतकऱ्यांना एक एकरात लावणासाठी आठ हजार रुपये, औषधी फवारणीसाठी चार हजार रुपये, तर काढणीसाठी बारा हजार रुपये खर्च येतो. त्यातून साधारणतः शंभर क्विंटल कांद्याचे उत्पन मिळणे अपेक्षित असते; मात्र यंदा करपा, दावणी आणि भुरी रोगांच्या तडाख्याने कांद्याची वाढ होऊ शकली नाही. औषधींचा मारा करूनही फारसा फायदा होऊ शकला नाही. लागवणीपासून ते काढणीपर्यंत एकरी तीस ते चाळीस हजार खर्च येत असताना उत्पन्न मात्र खर्चाच्या बरोबरीनेही निघत नाही, अशी स्थिती आहे. दरम्यान, यंदा सालेगाव, कोराळ, दावलमलिकवाडी शिवारात कांद्याची वाढ होऊ शकली नाही. मिळणारे उत्पन्न कमी, त्यात पुन्हा अगदी छोट्या आकाराचा कांदा असल्याने काढणीसाठी व वाहतुकीचा अवाढव्य खर्च करून मुद्दलात घाटा करण्यापेक्षा काही शेतकऱ्यांनी कांद्याच्या फडावर तणनाशक औषधीची फवारणी केली आहे. 
 
भाजीपालाही हातचा गेला 
बाजारपेठेत भाजीपाला महागला, अशी ओरड होते; मात्र भाजीपाला पिकविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या मेहनतीचे कोणी बोलत नाही. परतीचा पाऊस आणि रोगांमुळे कांद्याचा वांदा तर झालाच; शिवाय उभ्या टोमॅटो, वांगे, मिरची पिकांवरही त्याचा परिणाम झाला आहे. कोराळ येथील शेतकरी कमलाकर सुरवसे यांनी आधुनिक पद्धतीने वांग्याची लागवण केली आहे. ऐन फळधारणेत परतीच्या पावसाचा मारा आणि रोगांच्या प्रादुर्भावाने वांग्याची प्रतच बदलली. परिणामी त्याचा दरावर परिणाम झाला आहे. 

कांद्याचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रारंभीच्या काळात पाण्याची जमवाजमव करून कांद्याची लागवड केली. दीड एकरात लागवडीसाठी बारा हजार, खत, औषधी फवारणीसाठी सहा हजार रुपये खर्च केले; मात्र अतिपाऊस आणि रोगांमुळे उत्पन्नाचे गणित बिघडले. आता काढणी, कापणी आणि कांदा निवडीसाठी 15 हजार खर्च येतो. मिळणारे उत्पन्न हलक्‍या प्रतीचे असल्याने दर कमी मिळणार आहे. भले बाजारात दराची वाढ आहे; मात्र वाणच चांगले नसल्याने आर्थिक फटका सोसावा लागतो आहे. 
- प्रकाश सुरवसे, शेतकरी, कोराळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com