Aurangabad-Municipal
Aurangabad-Municipal

स्वच्छतागृहे करा, अन्यथा सभा उधळू

औरंगाबाद - शहरातील पाच महिला स्वच्छतागृहांची कामे तीन वर्षांनंतरही अर्धवट असल्याने शनिवारी (ता. २०) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेविका आक्रमक झाल्या. वारंवार पाठपुरावा करूनही कामे होत नसतील तर प्रशासनाचे काय करायचे? स्वच्छतागृहे करा; अन्यथा सभाच उधळून टाकू, असा इशाराही त्यांनी दिला. नगरसेवकांनीदेखील प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा समाधानकारक नसल्यास निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले. 

शहराची लोकसंख्या १५ लाखांच्या घरात असताना फक्त ५५ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. त्यामुळे महिलांची मोठी अडचण होते. याबाबत ‘सकाळ’ने ‘आम्ही जायचे कुठे?’ असे वृत्त प्रसिद्ध करून वाचा फोडली होती. महापालिकेमार्फत शहरात पाच ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्याचा निर्णय २०१५ मध्ये झाला होता. अद्याप एकही काम झालेले नाही. शनिवारी सभेला सुरवात होताच शिल्पाराणी वाडकर यांनी स्वच्छतागृहाचा विषय उपस्थित केला. मुख्य बाजारपेठेत स्वच्छतागृह नसल्याने महिलांची मोठी कुचंबणा होते. व्यापारी संकुलांमधील स्वच्छतागृहे कुठे गेली, असा प्रश्‍न त्यांनी केला. स्वच्छतागृहाचा प्रश्‍न मार्गी लावल्याशिवाय सभा चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. सीमा खरात यांनी कामे तातडीने पूर्ण व्हावीत यासाठी नगरसेविकांची समिती २०१५-२०१६ मध्ये स्थापन करण्यात आली होती. नगरसेविकांची सभागृहात मोठी संख्या असताना कामे होत नसल्याची लाज वाटते, अशा भावना व्यक्त केल्या. संगीता वाघुले, माधुरी अदवंत यांच्यासह इतरांनी प्रशासनाची कोंडी केली. त्यावर कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी यांनी औरंगपुऱ्यातील काम ऑक्‍टोबरच्या शेवटी संपेल, असा खुलासा केला. मात्र, सदस्यांचे समाधान झाले नाही. 

चारशे विद्यार्थ्यांसाठी एक स्वच्छतागृह
सिडको एन-सात येथील महापालिकेच्या शाळेत साडेचारशे विद्यार्थ्यांसाठी एकच स्वच्छतागृह असल्याचा आरोप माधुरी अदवंत यांनी केला. विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या पैशांचे काय झाले? असा प्रश्‍न त्यांनी केला असता प्राधिकरणाकडून ८३.५० लाख रुपयांपैकी ५८ लाख ९५ हजारांचा निधी मिळाला आहे. आठ ठिकाणी बांधकाम पूर्ण झाले असून, नऊ ठिकाणी काम करण्यात येत आहे, असे सिद्दिकी यांनी सांगितले. 

‘...तर खुर्ची खाली करा’ 
स्वच्छतागृहाची कामे पूर्ण करण्याचे काम अधिकाऱ्याला जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा; अन्यथा टाइम टेबल ठरवून त्याप्रमाणे कामे करण्यात यावीत, अशी मागणी राजेंद्र जंजाळ यांनी केली. 

‘दहा जागा द्या, काम आम्ही करून घेऊ’
प्रशासनाने वाद नसलेल्या शहरातील दहा जागा आम्हाला द्याव्यात, त्या ठिकाणी स्वच्छतागृह उभारून घेऊ, असे राजू वैद्य यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com