मेहनत तर वाया गेली, लागवड खर्चही निघेना 

tomato
tomato

औरंगाबाद : मागील वर्षभरात टोमॅटोने शेतकऱ्यांना जोरदार आर्थिक झटका दिला. डिसेंबर 2017 पासून दर पडलेलेच असल्याने शेतकऱ्यांची मेहनत तर वाया गेलीच; शिवाय लावलेला खर्चही निघाला नाही. ऐन दुष्काळाच्या तोंडी या शेतकऱ्यांवर टोमॅटोमुळे कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील टोमॅटोची ख्याती राज्यभर असून, जबलपूर (मध्यप्रदेश), नांदेड, परभणी; तसेच इतर राज्यांत हा टोमॅटो विक्रीला जातो. मात्र, मागील वर्षभरापासून टोमॅटोचे 30 किलोंचे कॅरेट हे 60 ते 100 रुपयांना विक्री झाले. 

खर्च 35 हजार, उत्पन्न 15 हजार 
पळशी शहर (ता. औरंगाबाद) हा टोमॅटो उत्पादक पट्टा आहे. येथे रोज किमान सात टन टोमॅटोचे उत्पन्न होत होते. येथील शेतकरी रमेश पळसकर यांनी त्यांच्या दीड एकर शेतात टोमॅटो लागवड केली. प्रत्येक झाडाला दीड ते दोन मीटर लांबीची व अडीच सेंमी जाडीची काठी रोवून झाडांच्या वाढीप्रमाणे ते काठीला बांधले. ठिबक सिंचन केले. खत, फरवाणी असा जवळपास 35 हजारांचा खर्च केला. मात्र, दरच मिळाला नसल्याने हाती फक्त 15 हजार रुपये पडले. म्हणजे त्यांना अजूनही 20 हजारांचा तोटा आहे. शेतीमध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंब राबते. त्यांच्या मेहनतीची किंमत केलेली नाही. ती जर जोडली तर तोटा आणखी वाढतो. शिवाय एका 30 किलोंच्या कॅरेटला 60 रुपये भाडे पडते. दहा रुपये कमिशन, 3 रुपये हमाली द्यावी लागते. त्यातच शंभर रुपयांना कॅरेट विकले तर खर्चही निघत नाही आणि 60 रुपयांना कॅरेट विकले तर खिशातून पैसे देण्याची वेळ येते. 

टोमॅटो पट्ट्यात मोठे नुकसान 
2016-17 या वर्षात टोमॅटोचे एक कॅरेट हे 400 ते 800 रुपयांना विक्री झाले होते. जुलै ते सप्टेंबर 2017 या काळात एक हजार रुपये कॅरेट असा दर गेला होता. चांगला दर मिळाल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील टोमॅटो पट्ट्यातील गावांतील शेतकऱ्यांनी पीक घेतले; मात्र डिसेंबर 2017 पासून दर पडल्याने या शेतकऱ्यांच्या हातात काही पैसे शिल्लक राहण्याऐवजी उलट त्यांना कर्जबाजारी व्हावे लागले. 

वर्षभर उत्पन्नापेक्षा खर्च जास्त 
टोमॅटोची लागवड वर्षभर म्हणजे तीनही हंगामांत, जून-जुलै (खरीप), सप्टेंबर-ऑक्‍टोबर (रब्बी), जानेवारी-फेब्रुवारी (उन्हाळी) केली जाते. टोमॅटोचे उत्पादन घेताना प्रत्येक झाडाला दीड ते दोन मीटर लांबीची व अडीच सेंमी जाडीची काठी रोवून झाडांच्या वाढीप्रमाणे ते काठीला बांधले जाते. खते देणे, फवारणी करणे, फळांची तोडणी, पाणी असा खर्च येतो. त्यामुळे वर्षभर टोमॅटो शेती ही तोट्याची राहिली. सध्या 200 रुपयांना 30 किलोंचे कॅरेट विक्री होत असले, तरी हा दरसुद्धा परवडणारा नाही. 

या वर्षी शेतातून उत्पन्नच झाले नाही. जेवढा खर्च लावला तेवढासुद्धा निघाला नाही. आता दुष्काळामुळे विहिरीने तळ गाठला आहे. आहे त्या पिकालाही पाणी देता येत नाही. हे वर्ष पूर्ण कठीण गेले. पुढचा काळ यापेक्षाही कठीण आहे. 
- रमेश पळसकर, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com